हृदय रोग
हृदय :
मानवाचे हृदय कसे आहे, त्याचे कार्य कसे चालते यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
जन्मजात हृदयदोष :
जन्मजात हृदयदोष हे जन्माच्या वेळीच्या हृदयातील दोषांमुळे होतात.
ह्रयूमॅटिक हृदयविकार :
ह्रयूमॅटिक हृदयविकार एक असा रोग आहे जो, घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरु होतो व हृदयाच्या झडपा निकामी होतात.(पडद्यासारख्या झडपा ज्यामुळे रक्ताचा उलटा प्रवाह रोखला जातो.)
हृदयविकार :
हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असे म्हणतात. अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही ह्यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
हृदयावरणातील उत्प्रवाह :
हृदयावरणातील उत्प्रवाह म्हणजे हृदयावरण पोकळीमध्ये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात द्रव साठणे.
हार्ट फेल्युअर :
‘हार्ट फेल्युअर’ चा सरळ अर्थ म्हणजे तुमचे हृदय जितक्या चांगल्या प्रकारे करायला पाहिजे तसे रक्त पंप करू शकत नाही.
मेद आणि कोलेस्ट्रॉल :
या विभागामध्ये हृदयाला आवश्यक इतके मेद आणि कोलेस्ट्रॉल याची मात्रा किती असावी याची माहिती दिली आहे.
ह्रदयरोगापासून बचाव :
ह्रदयरोग हे मरणाचे एक मुख्य कारण असू शकते. पण, आपण आजच एका आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करून भविष्यातील ह्रदयसंबंधी समस्यांना टाळू शकतो.
अतिरक्तदाब व हृदयविकार :
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे.
हृदयवेदना उर्फ अंजायना :
छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.
सांधेहृदयताप :
हा आजार खूप विचित्र आहे. यात एका विशिष्ट जिवाणूंमुळे घशाला सूज येते.
हृदयाच्या झडपांचे आजार :
झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे.
कारणे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ.) ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात.
(अ) कॉरोनरी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमून त्या आतून गंजतात व अरुंद होतात. रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे आणि धूम्रपान ही यामागची दोन प्रमुख कारणे आहेत.
(ब) अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो.
(क) कधीकधी भावनिक ताण (राग, भीती) अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते. (सिनेमात असे प्रसंग नेहमी असतात.)
(ड) शक्यतेपेक्षा अधिक श्रम व जोर लावणे, काम/व्यायाम करणे. विशेष करून थंडीच्या वातावरणात असे केल्यामुळे रक्तपुरवठयाची वाढीव मागणी पूर्ण करता न आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
(इ) रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे. हृदयवेदना रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या'हृदयवेदनेची' विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते. रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते. त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात. जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते. एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते.
रोगनिदान
पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते. ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे,घाम, इत्यादी त्रास असतो. - कधी कधी छातीत नुसतीच जळजळ किंवा खूप दम लागणे, पाठीकडे खूप दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. - काही जणांना काहीही लक्षण न जाणवताही हृदयविकाराचा झटका येतो (पण ते जाणवत नाही). निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे. - हृदयाचा आलेख (इसीजी) यांच्या मदतीने निदान होते. इसीजी म्हणजे हृदयाच्या सततच्या सूक्ष्म विद्युतप्रवाहांचा आलेख असतो. या आलेखातील बदलांवरून इतरही काही निष्कर्ष काढता येतात (उदा. हृदयाचा आकार, निरनिराळया कप्प्यांचे परस्पर संबंध, इ. - रक्ततपासणीमध्ये काही विशिष्ट द्रव्ये वाढलेली दिसतात.
तपासण्या
हृदयविकारामध्ये केल्या जाणा-या तपासण्या
1. ECG कार्डिओग्राम: ह्या तपासणीमध्ये रुग्णाच्या दोन हात (मनगटे), दोन पाय (घोटे) व छातीवर इलेक्ट्रोडस् जोडतात. हृदयाच्या क्रिया या हृदयात सौम्य स्वरुपात निर्माण होणा-या विद्युतप्रवाहाने चालतात. या क्रियेचा आलेख म्हणजेECG. हृदयविकाराचा झटका,हृदयाच्या तालबध्दतेत निर्माण झालेले दोष,हृदयाच्या कप्प्यांमध्ये निर्माण झालेले दोष, इ. माहिती या तपासणीत मिळते.
2. स्ट्रेस टेस्ट : यात रुग्णास इलेक्ट्रोडस् लावून एका फिरणा-या पट्टयावर चालवतात व एकीकडे त्याचा ECG घेत असतात. व्यायामामुळे हृदयावर कामाचा बोजा वाढल्यावर स्थिर अवस्थेत न सापडलेले दोष स्ट्रेस टेस्ट मध्ये सापडतात.
3. स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट : यात रेडिओऍक्टिव्ह पदार्थ इंजेक्शनद्वारे रक्तात देतात व हृदयामध्ये त्याचे चलनवलन बघतात.
4. ऍंजियोग्राफी : हृदयविकारामध्ये ही तपासणी करतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या सक्षमतेने काम करतात की नाही हे यात समजते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे एक किंवा अधिक रक्तवाहिन्या तुंबल्या असतील तर त्यानुसार ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची जरुरी लागते.
हृदयविकाराच्या झटक्यावरचा उपचार रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करावा लागतो. रुग्णालयातही असे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच असते.
प्रथमोपचार :
हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये जरा चालल्यावर छातीत मध्यभागी दुखणे, छातीवर दाब आल्यासारखे, घुसमट झाल्यासारखे वाटणे, इ. अशा त्रासावर एक अत्यंत प्राथमिक उपयुक्त साधन म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या सैल व रुंद करून रक्तप्रवाह सुधारणारे एक औषध-नायट्रेटची गोळी. हृदयवेदना आल्याआल्या ही गोळी लगेच जिभेखाली धरावी. काही सेकंदात औषध विरघळून जिभेखालच्या केशवाहिन्यांत शिरून रक्तात पसरते. रक्तावाटे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत औषध पोचून तिथला रक्तपुरवठा सुधारतो. याबरोबर वेदना कमी होते. यावरून वेदना हृदयविकाराची आहे हे निश्चित कळते. त्याबरोबरच पुढील नुकसान टळते व हृदयपेशी तग धरू शकतात. त्याचबरोबर वेदना सुरु झाल्यापासून रुग्णास झोपवून ठेवावे. कमीत कमी हालचाल करु द्यावी. पुढील सल्ल्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. हृदयविकाराची शक्यता क्वचित असली तरी ही अत्यंत स्वस्त असलेली गोळी नेहमी जवळ ठेवावी. यामुळे वेळप्रसंगी कोणालाही अत्यंत मोठी मदत होऊ शकेल. हृदयविकाराच्या रुग्णांनीही ही गोळी सदैव जवळ बाळगण्याची गरज आहे. या गोळीने रुग्णास जीवदान मिळू शकेल.
या गोळीबरोबरच ऍस्पिरिनची एक गोळी चूर्ण करून पाण्यात मिसळून लगेच द्यावी. यामुळे रक्त जास्त प्रवाही होते व नुकसान टळते. यासाठी ऍस्पिरिनच्या लहान गोळया मिळतात.
उपचार :
एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते.
प्रतिबंध :
- हृदयविकाराचे प्रमाण श्रीमंत-प्रगत समाजात वाढत आहे. अतिरक्तदाब हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे म्हणजे मांसाहारी जेवणाचा अतिरेक, चरबीयुक्त पदार्थ खात राहणे, वनस्पती तूप, इत्यादींमुळे रक्तातले चरबीचे प्रमाण वाढत जाते. हे चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमत जातात. हे या आजाराचे मुख्य कारण आहे.
- आहारावर नियंत्रण, शारीरिक कष्ट-व्यायाम आणि मानसिक आरोग्य या मार्गांनीच हृदयविकार टाळता येतील.
- योग्य आहार-विहार, तंबाखू, धुम्रपान टाळावे. उचित व्यायाम आणि मानसिक संतुलन याद्वारे हृदयविकार टाळता येतात. तसेच असलेला आजार हळूहळू बरा करता येतो. याबद्दल अगदी थोडक्यात पाहू या.
आहार :
- आहारात चरबी/तेल कमीतकमी वापरणे, कमी खाणे हे महत्त्वाचे. प्राणिज चरबी (मांसाहार, अंडे, इ.) वनस्पती तूप, बरीच तेले ही हृदयास हानीकारक असतात. त्यांचा वापर मर्यादित करावा किंवा टाळावाच. सोबत चांगली, मध्यम, वाईट तेलांचा एक तक्ता दिला आहे. मांसाहार टाळावा हे चांगले.
- श्रमाच्या व कष्टाच्या मानाने खाणे योग्य असावे. सर्व जादा अन्न शरीरात चरबीच्या रुपात साठते.
- भाज्या, फळे यांत चोथा जास्त, ऊर्जा कमी असते. असा आहार जास्त चांगला ठरतो.
व्यायाम :
व्यायामाची मूलतत्त्वे वेगळया प्रकरणात दिली आहेत. इथे एवढे सांगणे पुरेल की निदान रोज किमान अर्धा तास चालणे हे अशा रुग्णांना आरोग्यासाठी आवश्यक आहे.