तोंड आले? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून बघा !
तोंड आले की काही सुचेनासे होते. खाणं तर दूरच पण पाणी पिणंही कठीण होते. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्याचे सेवन, यामुळे तोंड येते. तोंड येणे ही साधारण बाब झाली आहे. त्यामुळे त्याची काही मुख्य कारणे जाणून घेऊन त्यावर काही घरगुती उपाययोजना केल्यात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.
तोंड येण्याची प्रमुख कारणे :-
१. जास्त मसालेदार पदार्थ खाणे.
२. जास्त गरम पदार्थ किंवा दारूचे सेवन करणे.
३. दातांची योग्य निगा न राखणे.
४. जास्त अॅसिडिक पदार्थांचे सेवन करणे.
५. शरीरात व्हिटॅमिन बी व आर्यनचे संतुलन नसणे.
६. अॅलर्जी असलेले पदार्थाचे सेवन करणे.
७. आजारी असतानाही बऱ्याच जणांना तोंड येते.
तोंड आल्यावर काही घरगुती उपाययोजना :-
१. एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.
२. तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या.
३. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
४. खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात.
५. लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.
६. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.
७. भरपूर पाणी प्या. यामुळे पोट साफ होऊन तोंडाला आराम मिळेल.