तोंड येणे
आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याचा त्रास जाणवतो. तोंड आल्यानं काही खाणं अशक्य होतं.
आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याचा त्रास जाणवतो. तोंड आल्यानं काही खाणं अशक्य होतं. शरीरामध्ये पित्ताची मात्रा वाढली, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, शरीरातील उष्णता वाढली की तोंड येण्याचा त्रास वाढतो. तोंडाच्या आतमध्ये सूज येणं, जीभेवरची त्वचा सोलली जाणं, तोंडाच्या आत गळूसारखे वा पुरळसदृष्य फोड येण्याचा त्रास दिसून येतो. हे सर्व तोंड आल्यामुळे होतं. काही वेळा बराच काळ उपाशी राहिलं तरीही तोंड येतं. या प्रकारात वेदनाविरहित आणि वेदना होण्याचा असा दोन्ही प्रकारे त्रास जाणवतो. त्यामुळे तोंडाच्या आतमध्ये जळजळ होणं, खारट आंबट अतिउष्ण पदार्थ खाणंही शक्य होत नाही.
खूप वेळ उपाशी राहणं, रात्री उशिरा जेवणं, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणं, तंबाखू, पानमसाला खाल्ल्यामुळेही तोंड येण्याचा त्रास वाढतो. रात्रीचं जागरण करणे, अतिउष्ण पदार्थांचं सेवन करणं, आहारात तिखट व मिठाचं प्रमाण अधिक असणं, मांसाहार करणं इत्यादी कारणांमुळे मुखाच्या आतल्या बाजूला किंवा ओठाच्या आतल्या बाजूला कधी कधी जिभेवर पुरळ येते वा जीभेवरची त्वचा सोलून निघते. तेथील त्वचा सोलली जाते. जीभ जड होते. मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकं व वेदनाशामक औषधं घेतल्यास शरीरास उपयुक्त जीवाणूदेखील मारले जातात. शिवाय अशा औषधांच्या जोडीला पूरक म्हणून जीवनसत्त्वाची औषधं घेतलेली नसल्यास आवश्यक जीवनसत्वं कमी होतात. त्यामुळेही तोंडात व्रण पडतात.
आहारात जीवनसत्त्व फोलिक अॅसिड, सियानो कोबाल्मिन यांच्यासह झिंक, लोह, तांबं इत्यादी खनिजांचा अभाव असल्याने पेशी विभाजित होतात त्यामुळे त्वचा सुटी होऊन तिथे व्रण पडतात. काही वेळा हिरड्यांना सूज आल्यानंही तोंड येते. लिंबू, पेरु आणि आवळा, संत्री अशी क वर्गातील फळं खाल्ल्यानं हिरड्या मजबूत होतात.
तोंड येण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ही काळजी घ्या;
- कायम पोषक आहार घ्या.
- ब जीवनसत्वाच्या गोळ्या पाच ते सात दिवस घ्या.
- आहारात दह्याचा समावेश करा.
- तुरटीच्या पाण्याने चूळ भरा.
- कोमट पाणी पित राहा.
- मुखदुर्गंधीचा त्रास जाणवत असेल तर तो रोखा. तुळशीची पानं चावून खा.
- कडक, तिखट, आंबट, खारट पदार्थांचं सेवन कटाक्षानं टाळा.
वारंवार तोंड येत आहे; खालील उपाय करा!
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर असेही म्हटले जाते. तोंड आल्यावर खाणे तर लांबच पण पाणी पिणेही अवघड होऊन जाते. तोंडाच्या आतल्या भागाला मुख्यतः जीभ, ओठ किंवा टाळा यां भागांना सूज येते किंवा या भागाची त्वचा सोलल्यासारखी होते. संपूर्ण तोंड लाल होते. यामुळे काहीही खाताना जिभेची आणि हिरड्यांची आग होते. त्यामुळे आपल्याला खाणे अथवा गिळणेही अशक्य होते. त्यामुळे हा विकार का होतो आणि त्यावर उपाय म्हणून काही घरगुती उपाययोजना केल्यात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.
** तोंड येण्याची काही कारणे -
1. जास्त मसालेदार, तेलकट, तिखट पदार्थ खाणे
2. शरिरातील 'बी' व्हिटॅमिन आणि अन्य काही पोषक द्रव्यांच्या अभाव
3. चहा, कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करणे
4. दारू, तंबाखूचे अतिसेवन तसेच अति धुम्रपान
5. जास्त अॅसिडिक पदार्थ खाल्याने
6. शरिरातील उष्णता वाढल्याने
7. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे इन्फेक्शन झाल्याने
काही घरगुती उपाययोजना -
1. तुळशीची दोन ते तीन पाने चावून खा.
2. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तुप टाकून मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावावे.
3. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खावे.
4. लिबांच्या रसामध्ये मध मिसळून गुळण्या केल्याने आराम मिळतो.
5. भरपूर पाणी प्यावे.
6. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून या पाण्याने गुळण्या कराव्यात. असे दिवसातून तीन वेळा केल्याने आराम मिळतो.
7. आहारात दूध, तूप, तोंडलीची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.