पायदुखी :
वेगवेगळ्या कारणांमुळे पायदुखी होते. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, की पाय दुखू लागतो. तर कधी पायाला सूज आल्याने वेदना निर्माण होते, हालचाल करणे कठीण होते. पायदुखी नेमकी कोणत्या कारणांनी होते, हे समजून घेणे गरजेचे आहे.
कारणे
पायातील वेदना अचानक सुरू होऊ शकतात किंवा हे दुखणे हळुहळू सुरू होते. कधी ते दुखणे पायाच्या विशिष्ट भागातच जाणवते, तर इतर वेळा संपूर्ण पायात वेदना होते.
>पायातील वेदना सतत सुरू राहतात. तसेच त्या अधूनमधून कळा आल्याप्रमाणे जाणवू शकतात.
>काही आजारात ही वेदना पायापासून सुरू होते आणि पुढे सतत संथ प्रमाणात होत असते. यात पायांना आग होते. कधी तीव्र वेदना पायाच्या एका टोकापासून दुसरीकडे जाताना जाणवते.
>पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे अशाप्रकारे देखील त्रास होतो. या वेदनेमुळे व्यक्तीच्या हालचालीत अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा शरीराचे वजन पायांना पेलवत नाही. पाठ आणि पाय दोन्ही दुखत असतील तर पेशंटच्या पायाच्या रक्तपुरवठ्यात दोष असतो.
>पायात जीवाणूंमुळे दाह होतो, तेव्हा तो भाग सुजतो, तेथे वेदना होतात. अंगात ताप चढतो, पाय सुजतो किंवा पायाचा ठराविक भाग लालसर होतो. हातापायाच्या रक्तवाहिन्यांतून स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी पडला, तर ते दुखणे चालण्याने वाढते.
>घोटा मुरगळणे म्हणजे घोट्याभोवती असलेल्या स्नायूंना इजा पोहोचणे. धावताना उंचसखल रस्त्यावर घोटा मुरगळू शकतो. या दुखापतीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. थोडा आराम केल्यावर हा त्रास कमी होऊ शकतो.
>चुकीच्या पद्धतीने धावल्यास पायाच्या दुखण्यांचा त्रास वाढू शकतो.
>शरिरावर अधिक ताण आल्यास पाठीवर विपरीत परिणाम होतो. पायात दुखतो.
>मासिक पाळीच्या दिवसांत पाय दुखतात.
प्राथमिक उपचार
>पायामध्ये बंद मोजे घालावेत.
>पाय घासू नयेत. कोणत्याही केमिकल तसेच वैद्यकीय सल्लाशिवाय क्रिम्सचा वापर करू नये.
>पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत.
>स्वच्छ पुसून पायाला कोमट तेल लावावे.
पाय दुखत असल्यास हे उपाय करुन पाहा
१. कामावरुन घरी आल्यावर खुर्चीवर एक पाय ठेवावा. दुसरा पाय जमिनीवर सरळ ठेवावा. यानंतर कमरेतून खाली वाकत पायाच्या अंगठ्याला हात टेकवण्याचा प्रयत्न करावा. साधारण ५ ते १० सेकंदांपर्यंत हे करत राहावे.
२. काही वेळ काम केल्यानंतर आपण बसलेल्या जागीच पाय सरळ करुन स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळाकरता आराम मिळतो.
३. पायांना नियमित मालीश केल्यानेही पायांचा थकवा कमी होतो. मालिश करताना तीळाच्या किंवा खोबरेल तेलाचा वापर केल्यास जास्त उपयुक्त ठरते. मालिश केल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि स्नायूंना आराम मिळतो.
४. पायांना सूज आली असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात दहा मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवावेत. यामुळे पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होते.
५. पाय दुखू नयेत यासाठी चांगल्या चपला किंवा बूट वापरावेत. हलक्या क्वालिटीचे बूट वापरल्यास पाय दुखतात. चप्पल कडक तसेच उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.
६. लठ्ठपणा हेही पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते. त्यामुळे ज्यांचे पाय दिर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा. लठ्ठ व्यक्तींचे वजन त्यांच्या गुडघ्यांवर येते, त्यामुळे त्यांचे गुडघेही दुखतात. अशांनी वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.