शरीरातून घाम बाहेर पडतो तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते. घाम येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. घाम हा प्रमाणापेक्षा कमी आला किंवा प्रमाणापेक्षा अधिक आला, तर ते एखाद्या आजाराचे लक्षण ठरू शकते. प्रमाणापेक्षा अधिक घाम येत असेल, तर त्याला हायपर हायड्रोसिस म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक घाम येणार्या व्यक्तींनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवले जाते. मात्र, अधिक घाम येणे हे आरोग्य ठीक नसल्याचे निदर्शक मानले जाते. प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याने शरीराच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये येणार्या घामामुळे अनेकांचे हाल होतात. सध्याच्या धावपळीच्या जगात घाम येण्याचा त्रास अधिकच जाणवतो. घरातून आवरून, टापटीप होऊन निघालेले लोक ऑफिसला जाईपर्यंत घामेघूम होऊन जातात. काही लोकांच्या घामाला अत्यंत घाण वास असतो. अशा लोकांनी कितीही डिओड्रंट फवारले, तरी घामाची दुर्गंधी येतच राहते. घाम येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नाही. कारण, ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र, जेव्हा एखाद्याला प्रमाणापेक्षा अधिक घाम येऊ लागतो, तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. अधिक घाम येण्याच्या समस्येला हायपर हायड्रोसिस असे म्हणतात. चेहरा, हाताचा तळवा, काख, पायाचे तळवे येथे अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो.
घाम येणे हे आरोग्याच्या दृष्टीने जरुरीच असते. मात्र, तो प्रमाणात आला तर आपले आरोग्य ठीकठाक आहे, असे समजावे; अन्यथा शरीरात काही समस्या निर्माण झाल्या आहेत, असे समजले जाते. शरीरातून किती घाम बाहेर यावा याबाबतचे निश्चित प्रमाण सांगता येत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, शरीरातून घाम आलाच पाहिजे. घाम ही शरीराचे संरक्षण करणारी नैसर्गिक पद्धती आहे. घाम येण्यामुळे शरीर थंड राहते. शरीराचे उष्णतेपासून संरक्षण होते. तसेच वेगवेगळ्या संसर्गांपासून शरीराचा बचाव होतो. शरीर गरम झाल्यावर शरीरातून घाम येतो. शरीरातील अल्कोहोल, कोलेस्टेरॉल, मीठ यांचे प्रमाण वाढल्यास त्यांना बाहेर काढण्याचे कामही घामाद्वारे केले जाते. घामामध्ये अँटी मायक्रोबियल पेप्टाथाईड नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ क्षयरोगासारख्या असाध्य व्याधीशी लढताना उपयोगी ठरतो.
घाम येण्याचा संबंध शरीरातील अंतर्गत घडामोडींशीसुद्धा असतो. चिंता, भय, तणाव या कारणांमुळेही त्वचेतून घाम बाहेर येतो. तारुण्यावस्थेला प्रारंभ झाल्यावर शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरातील लाखो घामग्रंथी कार्यरत होतात. शरीरातून बाहेर पडणार्या घामाशी विषाणूंचा संपर्क आल्यास घामाला दुर्गंधी येत राहते. हायपर हायड्रोसिस नामक व्याधी झालेल्या व्यक्तींना सर्वसामान्यांपेक्षा अधिक घाम येतो. या लोकांवर हवामान किंवा मूडचा काहीच परिणाम होत नाही. हायपर हायड्रोसिस ही समस्या मज्जासंस्थेशी निगडित आहे. ही समस्या असणार्या व्यक्तींच्या शरीरात घाम येणार्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात.
भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सात ते आठ टक्के लोकसंख्येला या समस्येने ग्रासले आहे. तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यानंतर हाताच्या आणि पायाच्या तळव्याला अधिक घाम येणे सुरू होते. हवामानातील बदल म्हणजे, उन्हाळा, अधिक शारीरिक श्रम होणे, भावनात्मक समस्या, हार्मोन्समधील बदल, मेनोपॉज, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉईड अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हायपर हायड्रोसिसची समस्या वाढते. तळलेले, तसेच मसालेदार पदार्थ खाल्ल्यावरही अनेकांना जास्त घाम येऊ लागतो. प्रमाणापेक्षा अधिक घाम येणे हे एखाद्या गंभीर व्याधीचे लक्षणसुद्धा असू शकते. स्थूल व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात जाणवते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पन्नास टक्के लोकांमध्ये ही समस्या आनुवंशिक असते.
प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याची आणखी कारणे खालीलप्रमाणे...
1) हार्मोन्स संबंधातील औषधे, तसेच मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यावरच्या औषधांमुळे अधिक घाम येतो.
2) संसर्गजन्य व्याधी, वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग, हृदय आणि फुफ्फुसासंबंधीचे आजार असणार्यांनासुद्धा अधिक घाम येतो. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान अधिक घाम येण्याची समस्या जाणवते.
3) मेंदूच्या समस्या (मस्तिष्काघात) असणार्यांनाही अधिक घाम येऊ शकतो. सातत्याने शरीरातून प्रमाणापेक्षा अधिक घाम येऊ लागला, तर डॉक्टरांशी संपर्क साधा. यामुळे तुम्हाला काही गंभीर व्याधी झाली असेल, तर तिचे निदान आधीच होऊ शकते.
अधिक घाम येणार्यांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी...
1) दररोज थंड पाण्याने अंघोळ करावी.
2) सुती आणि लिननचे कपडे वापरावेत.
3) घामाचे डाग कपड्यांवर पडू नयेत यासाठी अंडरआर्म पॅड वापरावेत.
4) अँटी बॅक्टेरिअल साबणानेच अंघोळ करावी. अशा साबणामुळे त्वचेवर विषाणूंची निर्मिती होत नाही. त्वचेवर विषाणूंची निर्मिती न झाल्यास आपल्या घामाला दुर्गंधी येत नाही.
5) रात्री झोपताना आपल्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना अँटी पर्सिपेरंट लावावे.
6) योगासने, प्राणायाम याद्वारे मनावरचा ताण दूर होतो. मनावरच्या ताणामुळेही अनेकदा घामाचे प्रमाण वाढत असते.
7) घाम अजिबातच येत नसेल किंवा नेहमीपेक्षा खूपच जास्त येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. याचबरोबर शरीरातून येणार्या वासामध्ये बदल झाला असेल, तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
यासंदर्भात त्वचाविकार तज्ज्ञांशी सल्ला मसलत करणे योग्य ठरते. हायपर हायड्रोसिस ही व्याधी झालेल्या रुग्णांना त्वचारोगतज्ज्ञ बोटोक्स प्रमाणात घाम येतो अशा लोकांनी उन्हाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यात अशा व्यक्तींनी ताजे जेवण घ्यावे व हलका आहार घ्यावा. काकडी, पुदीना, संत्री, टरबुज यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये सोडियम आणि कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए यांचे प्रमाण खूपच अधिक असते. उन्हाळ्यात दही, ताक यांचे सेवन करणे आवश्यक असते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहाते. उन्हाळ्यात अशा व्यक्तींनी भरपूर कांदा खावा. कांद्यामध्ये उन्हापासून त्वचेवर होणारे परिणाम रोखले जातात.
टरबूज, कलिंगडे हे पदार्थ खास उन्हाळ्यातील पदार्थ समजले जातात. यामध्ये 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात शरीराला खूपच जास्त घाम येतो. घाम जास्त आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात जास्त उष्मांक (कॅलरी) असलेले पदार्थ खाऊ नयेत. ज्या अन्नपदार्थांमध्ये पौष्टिकता भरपूर आहे, असे अन्नपदार्थ उन्हाळ्यात आहारात समाविष्ट करावेत. तेलकट आणि मसालेदार पदार्थ उन्हाळ्यात खाणे टाळावेत. तसेच उन्हाळ्यात भरपूर फळे खावीत, फळांमध्ये 80 टक्के पाणी असते. ज्या लोकांना अधिक घाम येतो अशा लोकांनी, कोबी, फ्लॉवर, कच्चे केळे, डाळिंब, भेंडी, वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश आहारात करावा.
अधिक घाम येण्याबरोबरच घामाला दुर्गंधी येणे हिही आरोग्याची समस्या मानली जाते. बॉडी स्प्रे किंवा डिओड्रंट फवारून तुम्ही काही दिवस वेळ मारून नेऊ शकता. मात्र, नोकरदारांना अशा व्याधीवर तातडीने उपचार करून घेणे योग्य ठरते. तुमच्या घामाला दुर्गंधी येत असेल तर मित्र, सहकारी तुमच्या जवळ येणे टाळू लागतात. तुम्हाला कोणी तुमच्या घामाच्या दुर्गंधीबद्दल बोलत नाहीत, मात्र त्यांचे वर्तन तुम्हाला टाळण्याचे असते. आपल्या घामाला दुर्गंधी येते आहे हे कळाल्यावर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.