सध्याचे दिवस म्हणजे वैशाख वणव्याचे दिवस. या काळात शरीराची किंवा त्वचेची कितीही काळजी घेतली तरी अनेक समस्यांना सामोरे जावेच लागते. खरे पाहता सध्याच्या घडीला झाडांची संख्या कमी झाली असून वाहनांची, इमारतींची संख्या वाढली आहे. त्यातच वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे माणसाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकतर उन्हाची तीव्रता आणि त्यातच वायू प्रदूषण या सा-याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसून येतो. यामध्येच आता शाळांना सुट्टी लागल्यामुळे लहान मुलेही सतत उन्हामध्ये खेळताना दिसून येतात. लहान मुलांना आपण खेळण्यापासून अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या आहारात काही ठराविक बदल करुन त्यांना होणा-या आजारापासून वाचवू शकतो.
बाह्य परिस्थितीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. या बाह्यपरिस्थितीशी लढा देण्यासाठी आपल्याला शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. जर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कोणत्याही ऋतूशी सामना करण्यासाठी तयार राहू शकतो. मुख्यत: उन्हाळ्यामध्ये शरारातील पाण्याची पातळी खालावलेली असते. ही पातळी भरुन काढण्यासाठी आहारात काही पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यातही असे काही पेयपदार्थ आहेत जे रोगप्रतिकारशक्ती वाढवून होणा-या आजारांपासून आपले संरक्षण करु शकते.
१. जिंजर लेमन टी : जिंजर लेमन टी हा एकप्रकारे अँटीऑक्सि़डंटचे काम करतो. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शराराला तरतरी येऊ काम करण्याचा उत्साह वाढवितो. जिंजर लेमन टी दररोज एक कप प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
२. वॉटरमेलन अॅण्ड मिंट स्मुदी : कलिंगडाचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करुन हा ज्युस तयार केला जातो. कलिंगडामध्ये पाण्याची क्षमता जास्त असून पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याचे काम करतात. हा ज्युस चवीबरोबरच आरोग्यासाठीही लाभदायक असतो.
३. आरेंज ज्युस : आंबट-गोड अशी संत्री चवीबरोबरच आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी पुरवत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये सर्वत्र संत्री दिसून येतात. काही हॉटेलमध्ये वैगरे तर संत्र्यांपासून नवनवीन पदार्थ देखील उपलब्ध असतात. मात्र उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असल्यामुळे शरीराची झीज भरुन काढण्यासाठी ऑरेंज ज्युस महत्वाचे कार्य करते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातील रक्ताला क्षारमय करते. त्याचा चांगलाच फायदा होतो.
४. हनी अॅण्ड वॉटर : मध हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. बाह्य त्वचेच्या रक्षणाबरोबरच मध शरीराच्या अंतर्गत स्वच्छता करण्याचेही काम करतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मध फायदेशीर ठरत असून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही मध करते. यासाठी गरम पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होते.
५. ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये सर्वात जास्त अॅटीक्सिडंटस असतात. चहाची ही लहान लहान पाने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्याचे काम करतात. तसेच ग्रीन टी थायरॉईडसारख्या आजारांनाही आपल्यापासून दूर ठेवतो.
म्हणून उन्हाळ्यामध्ये शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या पेयांचा समावेश दिवसातून एकदा आपल्या आहारात समावेश करायला हवा. तसेच उन्हाळ्याव्यतिरिक्तही अन्य ऋतूमध्ये या पेयांचे सेवन केल्यास शरीराला फायदाच होणार आहे.