एखाद्या विषाणूचे देशात अतिक्रमण होणे आणि त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणे हे आता म्हणावे तितके नवीन नाही. काही वर्षांपूर्वी आलेला स्वाईन फ्लू असो किंवा चिकनगुनिया असो. केरळमध्ये नुकताच निपाह नावाच्या विषाणूची बाधा झाल्याने मागच्या काही तासांत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. मानवी जीवनावर अचानकपणे आक्रमण केलेला हा व्हायरस नेमका आला कुठून, त्याची लक्षणे काय आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, त्यावरील उपचार यांबाबत वेळीच माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे केंद्रसरकारने त्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलली असतील तरीही या विषाणूबाबत विस्ताराने जाणून घेऊया…
१. जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे.
२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. त्या गावाच्या नावावरुन त्याचे नाव निपाह ठेवण्यात आले.
३. सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला. यावेळी २६५ जणांना त्याची लागण झाली आणि त्याने गंभीर स्वरुप धारण केल्याने सगळ्यांचा मृत्यू झाला.
४. ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.
५. या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
६. या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.