वाढत्या वयाच्या खुणा आपल्या चेह-यावर स्पष्ट दिसत असतात. त्यात जर मनावर ताण असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होत असतो. त्यामुळे चेह-यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. मनावरील ताण योगा, प्राणायम, ध्यान करुन कमी करता येऊ शकतो. मात्र चेहऱ्यावरील तणावाची चिन्हे कमी करण्यासाठी प्रसाधनांपेक्षा सकस आहाराची गरज आहे. योग्य आहारामुळे शरीराला पोषकद्रव्ये मिळतात. त्यांच्या सेवनामुळे शरीराची झीज भरुन निघते आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या चेह-यावर दिसून येतो. अवघ्या ३० दिवसांत चेहऱ्यावरील थकवा कमी करण्यासाठी अंशिका शारदा यांनी सुचवले काही खास उपाय
१. योग्य प्रमाणात झोप – मानवी शरीराला २४ तासांपैकी ७-८ तासांच्या झोपेची गरज असते. शरीराला योग्य प्रमाणात झोप मिळाल्यावर त्याचा परिणाम आपल्या चेह-यावर आपोआप दिसून येतो. योग्य प्रमाणात झोप मिळाल्यास त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. पुरेशी झोप झाल्यास रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे फायद्याचे ठरते.
२. व्यायाम करणे – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कमी वयात स्थुलतेची समस्या सध्या सर्वत्र पहायला मिळते. स्थूलतेमुळे चेह-यावरील चरबीही वाढते. ही चेहऱ्यावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही व्यायामाचा उपयोग होतो. व्यायामामुळे चेहऱ्यावर प्रसन्नता येते. त्यामुळे दररोज किंवा आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करणे गरजेचे आहे.
३. अतिनील किरणांपासून संरक्षण करणे – सुर्यापासून निघणा-या अतिनील किरणांचा परिणाम थेट आपल्या चेह-यावर होत असतो. त्यामुळे त्वचा टॅन होणे, काळवंडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच चेह-यावर सुरकुत्यादेखील लवकर पडतात. यासाठी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हात बाहेर पडताना चेहरा रुमालाने झाकून घेणे गरजेचे आहे. तसेच घरी करण्यात आलेला टोमॅटोचा किंवा काकडीचा लेप चेह-यावर लावणे फायद्याचे ठरेल.
४. पोषकद्रव्यांचे सेवन – ज्या पदार्थांमध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थांचे सेवन करणे. यामध्ये असलेल्या ‘ओमेगा ३’मुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो. याबरोबरच त्वचेवर सूज असल्यास ती कमी करण्यास उपयोग होतो.
५ फळांचे सेवन- आहारामध्ये फळांच्या सेवनाला विशेष स्थान देण्यात आले आहे. यात सफरचंद, अननस, किवी यासारख्या फळांमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होऊन चेह-याचा पोत सुधारण्यास मदत होते.
चेह-याला नवतजेला देण्यासाठी अनेक उपाय आहेत. मात्र आपण करत असलेल्या उपायांमध्ये सातत्य महत्वाचे आहे. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतात. यासाठीच चेह-यावरील थकवा घालवायचा असेल तर वरील दिलेले उपाय एक महिनाभर रोज करणे गरजेचे आहे.