पचनक्रियेशी निगडित तक्रारी या सध्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. आपल्या जीवनशैलीमध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा परिणाम झाल्याने पचनक्रिया बिघडते. अपुरी झोप, खाण्याच्या वेळा, जंकफूडचा समावेश आणि इतर अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. मग गॅसेस होणे, बद्धकोष्ठता किंवा अपचन अशा अनेक तक्रारी सातत्याने सुरु होतात. पण या पचनाशी निगडित तक्रारींवर वेळीच मात करायची असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक असते. यामध्ये नियमितता ठेवल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. आता या गोष्टी नेमक्या कधी केलेल्या चांगल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिवसाची सुरुवात म्हणजेच सकाळ यासाठी उत्तम वेळ आहे.
पाणी प्या
सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावे असे आपण अनेकदा ऐकतो. पण कधी मोबाईलच्या नादात नाहीतर ऑफीसला जाण्याच्या धावपळीत आपण ती गोष्ट विसरुन जातो. पण उठल्यावर पाणी पिणे हे तुमच्या पचनक्रियेसाठी उपयुक्त असते. त्यामुळे उठल्यावर किमान एक ग्लास पाणी प्यायलाच हवे. पोटाचे कार्य सुरळीत होण्याबरोबरच मेंदूचे काम चांगले होण्यासाठीही पाणी पिणे उपयुक्त ठरते. याच पाण्यात लिंबू पिळल्यास आणखी चांगले.
योगासने
योगासने हा भारतीय पारंपरिक व्यायाम समजला जातो. सकाळी झोपेतून उठल्यामुळे आपले शरीर काहीसे कठिण झालेले असते. त्यामुळे स्ट्रेचिंग केल्यास ते मोकळे होण्यास मदत होते. किमान १५ ते २० मिनिटे केलेला व्यायामही उपयुक्त ठरतो.
ध्यानधारणा
ध्यान हे मनाच्या शांतीसाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी ध्यान करण्याची सवय अतिशय गरजेची आहे. त्यामुळे सकाळच्या वेळात तुम्ही किमान ५ ते १० मिनिटांसाठी ध्यान केले तर तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होऊ शकते.
पोटाला मसाज करा
झोपेतून उठल्यावर पोटाला हलका मसाज करणे पचनाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. हा मसाज उजव्या बाजूने डाव्या बाजूला करायला हवा. असे हळूवारपणे काही मिनिटे केल्यावर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
समतोल न्याहरी
न्याहरी ही दिवसभरातील पहिलेच खाणे असल्याने ती समतोल असायला हवी. हे खाणे पौष्टीक असायला हवे. चांगली न्याहरी घेतल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते आणि शरीरातील उर्जा टिकून राहते. त्यामुळे न्याहरीत फायबरचे प्रमाण असेल असा प्रयत्न करा. न्याहरीत तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची लापशी असल्यास उत्तम.