चिंता, काळजी या गोष्टी सध्याच्या तणावात्मक जीवनशैलीच्या अविभाज्य भाग आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा पिच्छा काही या चिंतेने सोडलेला नाही. पण तुम्ही याचा सखोल विचार केलात तर काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला सतत काळजी जाणवत असते. नेमक्या या चुकीच्या सवयी कोणत्या, याविषयी...
दिवसेंदिवस स्पर्धात्मक जागाला सामोरं जाताना ताण-तणाव अन् इतर मनोविकारही आपल्या जीवनाचा एक भाग झालेत.
ताणामुळे अगदी कमी वयात नैराश्य येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे व्यायाम, योग व ध्यानधारणा करुन तणावमुक्त जीवनशैली जगण्याचा सर्वांचा मानस असतो. तरीही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता, काळजी आपल्याला सतावत असते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांची चिंता, काळजी काही पिच्छा सोडत नाही.अभ्यास कसा होईल?परीक्षेत चांगले गुण येतील ना? अशी लहान मुलांना तर मला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल? माझं पुढे करिअर कसं होईल अशा नानाविविध चिंता या तरुण वयात भेडसावत असतात. तरुणाईला तर अनेक कारणांमुळे ताणाला सामोरं जावं लागतं. पण तरुण मंडळींनी आपल्या सवयींमध्ये काही बदल केल्यास नक्कीच फरक पडू शकतो. तरुण पिढीच्या काही चुकीच्या सवयी आणि त्याला पर्याय यांचा अभ्यास आपण आजच्या लेखातून करणार आहोत.
झोपण्याच्या चुकीच्या सवयी
ताण जाणवण्याला सर्वात जास्त जबाबदार गोष्ट असेल तर ती म्हणजे अपुरी झोप. रात्री-अपरात्री फोनवर चॅटिंग करणं किंवा लॅपटॉपवर चित्रपट बघत बसणं अशा चुकीच्या सवयी अनेकांना असतात. या सगळ्यामध्ये झोप ही बाब प्राधान्यक्रमावर कधीच नसते. परिणामी, याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.