अगदी लहान वयात धूम्रपान करणारी मुले नंतर ड्रग्जच्या आहारी जात असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
कॅनडातील डी मॉन्ट्रियल विद्यापीठातील संशोधकांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या धोक्याची माहिती करून देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. लहानपणी सुरू केलेल्या धूम्रपानाचा पुढे किती मोठा धोका निर्माण होतो याची माहिती मुलांना देण्याची गरज असल्याचेही संशोधक सांगतात. सध्या अनेक देशांत उघडपणे व्यसन केले जाते आणि समाजानेही त्याला मान्यता दिली आहे. मात्र त्याचा परिणाम घातक आहे, असेही संशोधकांनी सांगितले.१५ ते १७ या वयादरम्यान धूम्रपान सुरू केलेल्या मुलांमध्ये ड्रग्जकडे वळण्याचे प्रमाण ४४ टक्के इतके आहे.
१५ पेक्षाही कमी वयात धूम्रपान सुरू करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ६८ टक्के आहे. हे संशोधन कॅनेडियन जनरल ऑफ सायकेट्री या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात संशोधकांनी १०३० मुलांचा अभ्यास केला. १३ ते १७ वयोगटातील मुले गेल्या काही वर्षांपासून गांज्याच्या आहारी केल्याचे समजले. तर २० ते २८ वयोगटातील मुले गांजा, ड्रग्ज, कोकेन, हेरॉइन यांच्या आहारी गेल्याचीही धक्कादायक माहिती संशोधकांना मिळाली. आता या मुलांनी कधीपासून व्यसन सुरू केले याचा शोध संशोधकांनी घेण्यास सुरुवात केली. तर ही सर्व मुले अगदी लहानपणापासूनच व्यसनांच्या आहारी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही मुले ड्रग्जपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
एखाद्या विषाणूचे देशात अतिक्रमण होणे आणि त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणे हे आता म्हणावे तितके नवीन नाही. काही वर्षांपूर्वी आलेला स्वाईन फ्लू असो किंवा चिकनगुनिया असो. केरळमध्ये नुकताच निपाह नावाच्या विषाणूची बाधा झाल्याने मागच्या काही तासांत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. मानवी जीवनावर अचानकपणे आक्रमण केलेला हा व्हायरस नेमका आला कुठून, त्याची लक्षणे काय आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, त्यावरील उपचार यांबाबत वेळीच माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे केंद्रसरकारने त्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलली असतील तरीही या विषाणूबाबत विस्ताराने जाणून घेऊया…
१. जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे.
२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. त्या गावाच्या नावावरुन त्याचे नाव निपाह ठेवण्यात आले.
३. सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला. यावेळी २६५ जणांना त्याची लागण झाली आणि त्याने गंभीर स्वरुप धारण केल्याने सगळ्यांचा मृत्यू झाला.
४. ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.
५. या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
६. या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई : मायग्रेनचा त्रास असणार्यांमध्ये डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणावते. प्रामुख्याने हा त्रास डोक्यामध्येच आढळत असावा असे सामान्यपणे तुम्हांला वाटत असेल. परंतू मायग्रेनचा त्रास हा पोटदुखीच्या स्वरूपातूनही वाढतो. मायग्रेन केवळ डोक्यात नव्हे तर पोटातही त्रासदायक ठरू शकतो. पोटात वाढणार्या या त्रासाला अॅबडॉमिनल मायग्रेन असे म्हटले जाते. यामध्ये पोटात तीव्र वेदना जाणवणं, मुराडा मारणं, थकवा, उलटीचा त्रास जाणवतो.
धोका कोणाला?
पोटातील मायग्रेनचा त्रास हा प्रामुख्याने अनुवंशिक असतो. सर्वाधिक हा त्रास लहान मुलांमध्ये आढळतो. आई-वडीलांना मायग्रेनचा त्रास असल्यास मुलांमध्येही हा त्रास वाढतो. मुलींना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. लहान मुलांमध्ये अॅबडॉमिनल मायग्रेनचा त्रास असेल तर मोठेपणी मायग्रेनचा त्रास हा डोक्यात वाढण्याची शक्यता असते.
पोटातील मायग्रेनचं कारण काय?
पोटात वाढणार्या मायग्रेनचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही. मात्र डॉक्टरांच्या मते, शरीरात हिस्टामाइन आणि सेरोटोनिन या हार्मोन्समुळे वेदना वाढतात. नैराश्य किंवा सतत चिंता करण्यामुळे शरीरात मायग्रेनचा त्रास वाढतो. चायनीज फूड, इन्स्टंट नूडल्स यांच्या अतिसेवनामुळे शरीरात मोनोसोडियम ग्लुटामेट, एमएसजी, प्रोसेस्ड मीट, चॉकलेट अतिप्रमाणात खाल्ल्यानेही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
लक्षणं काय?
पोटात तीव्र वेदना
पोटाचा भाग पिवळसर दिसणं
दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवणं
भूक मंदावणं
डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसणं
अनेकदा ही लक्षण सामान्य आणि इतर अनेक आजारांमध्येही दिसणारी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. सुरूवातीपासून ही लक्षण दिसतातच असे नाही.
पोटातील मायग्रेनचा त्रास अर्धा तासामध्ये ठीक होतो. तर काही जणांना हा त्रास 2-3 दिवस जाणवतो.
मुंबई : फिटनेस आणि उत्तम दिसण्यासाठी अनेकदा लोकं जिम ज्वाइन करतात. मात्र थोड्याशा एक्सर्साइजनेच दम निघून जातो. जर तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर याचा अर्थ तुमचा स्टॅमिना कमी आहे. कमी स्टॅमिना असल्यामुळे तुम्ही जीमचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. पण स्टॅमिना कमी असल्यामुळे घाबरण्याच काही कारण नाही. कारण काही सोप्या गोष्टीमुळे तुम्ही स्टॅमिना सहज वाढवू शकता.
यामुळे स्टॅमिना कमी होतो
शरीरातील स्टॅमिना कमी होण्याची अनेक कारण आहेत. अनेकदा पाणी कमी असल्यामुळे स्टॅमिना कमी होतो. शरीरातील 70 टक्के भाग हा पाण्याने भरलेला असतो. शरीराला सतत पाण्याची आवश्यकता लागते. जर तु्मच्या शरीरात कमी पाणी असेल आणि तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तरीही स्टॅमिना मेनटेन राहणार नाही. यामुळे दिवसाला 4 ते 5 लिटर पाणी प्यावे.
रनिंगच्या अगोदर पाणी आवश्यक
जर तुम्ही रोज सकाळी धावायला जात असाल तर शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रनिंगच्या अगोदर कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्या. तसेच धावायला जाताना पाण्याची बॉटलसोबत ठेवा. अधिक मेहनतीचे काम केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आणि डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.
शरीरात कार्बोहायड्रेटची कमतरता
कार्बोहायड्रेट तुमच्या शरीराला एनर्जी देतात. सामान्यपणे आहार कार्बोहायड्रेड असेल तर त्यातून मिळणारी ऊर्जी ही दिवसभर पुरते. मात्र जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा अतिरिक्त मेहनत करत असाल तर शरीरात कार्बोहायड्रेडची कमतरता जाणवते. वर्कआऊटच्या 40 मिनिटे अगोदर कार्बोहायड्रेडचे रिच डाएट नक्की घ्या.
मुंबई : केसगळतीची अनेक कारणं आहेत. काही जणांना केसगळतीचा त्रास पोषक आहाराच या अभावामुळे होतो तर काही जणांमध्ये हा त्रास अनुवंशिक किंवा लाईफस्टाईलमधील काही चुकांमुळे बळावतो. केसगळतीबाबत अनेक समज - गैरसमज आहेत. अशापैकी एक म्हणजे हेल्मेटचा वापर केल्याने केसगळतीचा त्रास वाढतो. तुमच्या मनातील या प्रश्नाला एक्स्पर्टनी दिलेला खास सल्ला नक्की जाणून घ्या.
खरंच हेल्मेटच्या वापरामुळे केस गळतात का?
अनेकांना असे वाटते की, हेल्मेटच्या वापरामुळे केसांची मूळं श्वास घेऊ शकत नाहीत. ऑक्सिजनच्या अभावामुळे केस मूळांपासून कमजोर होतात परिणामी केसगळतीचा त्रास वाढतो. हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्टच्या मते, केसांच्या मूळांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी बाहेरील हवेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. रक्तातूनच केसांच्या मूळांना आवश्यक ऑक्सिजन मिळतो.
हेल्मेटचा अतिवापर त्रासदायक
हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, हेल्मेट अति घट्ट असल्यास त्याचा डोक्यातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यामुळे केसगळतीचा त्रास वाढू शकतो. सोबतच हेल्मेट नीट स्वच्छ केलेले नसल्यास त्यामधून टाळूवर इंफेक्शन पसरू शकते. केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
हेअर ट्रान्सप्लान्ट एक्सपर्ट्सचा खास सल्ला
हेल्मेट किंवा टोपी वापरताना त्याची स्वच्छता तपासून पाहणं आवश्यक आहे. त्यामधील अस्वच्छता केसांमध्ये अस्वच्छता पसरण्याचे कारण ठरू शकते.
हेल्मेट घाई-घाईत घालू किंवा काढू नका. असे केल्यास तुमचे केस तुटण्याची दाट शक्यता असते.