प्लॅस्टीक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे प्लॅस्टीक आपल्या आयुष्यातून लगेचच पूर्णपणे हटणे अवघडच आहे. आपण प्लॅस्टीकच्या पिशव्या, विविध भांडी आणि इतरही अनेक वस्तू प्लॅस्टीकच्या वापरतो. मुख्यतः पाणी पिण्याच्या बाटल्या या प्लॅस्टीकच्याच असतात. मात्र त्यामुळे आपल्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. प्लॅस्टीकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने नेमके कोणते त्रास होतात त्याविषयी…
१. आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बाटली सोबत घेतो पण ही बाटली प्लॅस्टीकची असते. या प्लॅस्टीकची गुणवत्ता चांगली नसल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
२. विकत मिळणाऱ्या प्लॅस्टीकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी आणखीनच हानिकारक असते. विकतच्या बाटल्या कमी दर्जाच्या असल्याने त्यातून पाणी पिऊ नये.
३. प्लॅस्टीकची बाटली सूर्यप्रकाश, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. ही द्रव्ये पाण्यात मिसळली गेल्याने ते पाणी पिणे चांगले नसते.
४. पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने तयार केलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. मात्र यामध्ये थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या वापरणे सुरक्षित आहे.
५. मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये. तसेच आपली नियमीत पाण्याची बाटली कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशरने स्वच्छ करत रहावी.
दिवसभर ऑफीसमध्ये काम करुन घरी आल्यावर आपण सगळेच दमलेले असतो. प्रवास, कामाचा ताण आणि इतर अनेक गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिकरित्याही थकून जायला होते. अशावेळी आपण घरी येतो आणि काही काळ आडवे होतो. यामुळे रिलॅक्स वाटेल असे जरी आपल्याला वाटत असले तरीही थकवा घालविण्यासाठी हा उत्तम मार्ग असू शकत नाही. तर असे अनेक चांगले उपाय आहेत त्यामुळे तुमचा थकवा काही वेळात निश्चितच कमी होऊ शकतो. पाहूयात असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपला थकवा कमी होण्यास मदत होईल.
* आंघोळ करा
दिवसभर काम करुन थकवा आल्यानंतर आंघोळ करणे हा उत्तम उपाय असू शकतो. या आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकल्यास शरीराचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. तुमच्याकडे बाथटब असेल तर आणखीनच छान. त्यामध्ये १५ ते २० मिनीटे पडून राहील्यास थकवा जाण्यास मदत होते.
* स्ट्रेचिंगचे व्यायाम करा
आपण ऑफीसमध्ये किमान ७ ते ८ तास बसून असतो. यामुळे आपल्या शरीराचे स्नायू आखडतात आणि दुखतात. त्यामुळे तुम्ही घरी आल्यावर स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. यामुळे तुम्हाला छान झोपही येईल. तसेच अशाप्रकारचे व्यायामप्रकार केल्यामुळे तुमचे शरीर लवचिक राहण्यासही मदत होईल.
* ध्यानधारणा करा
ध्यान करणे हा ताण कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे घरी आल्यावर डोळे मिटून काही वेळ शांत बसा. यावेळी श्वासावर लक्ष केंद्रित करुन डोक्यात जे विचार येतील ते येऊद्या. त्यामुळे डोके शांत होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने नकारात्मकता काही प्रमाणात कमी होऊन तुम्ही नकळत प्रसन्न होता.
* गाणी ऐका किंवा पुस्तके वाचा
आपण करत असलेले काम हे आपली आवड असेलच असे नाही. त्यामुळे आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी केल्यास आपल्याला प्रसन्न वाटते. गाणी ऐकणे आणि आपल्या आवडीचे काहीतरी वाचणे यामुळे आपण नक्कीच रिलॅक्स होतो. त्यामुळे दमून घरी गेल्यावर गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे हा थकवा घालवण्याचा उत्तम उपाय होऊ शकतो.
कमी शुक्राणू व्यक्तींना आजारपणाचा धोका इतरांपेक्षा अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. संशोधन करण्यात आलेल्या ५,१७७ पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी, चरबीचे प्रमाण २० टक्के अधिक, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक वैशिष्टय़ांमध्ये वाढ करणारे टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी सांगितले की ज्या व्यक्तींमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते त्यांच्यामध्ये अधिक आरोग्य समस्या असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेची समस्या ही प्रत्येकी तीनपैकी एका जोडप्याची समस्या असल्याचे संशोधकांनी सांगितले.
परंतु नवीन अभ्यासासाठी संशोधकांनी इटलीतील जोडप्यांमधील पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला. वीर्याची गुणवत्ता ही पुरुषांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या अनेक व्यक्तींचा यादरम्यान संशोधकांनी अभ्यास केला. त्यानुसार ही समस्या असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधूमेह आणि हृदयविकाराचा धोका असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. या संशोधनात पुरुषांमध्ये १२ पटींनी टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे मांसपेशी आणि स्नायूंच्या आजारांचाही धोका संभवत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे सध्या अनेकांना सर्दी, ताप आणि मुख्य म्हणजे खोकला होत आहे. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खोकल्याचा त्रास होत आहे. २ दिवसांपूर्वी पडलेला बारीक पाऊस, दुपारी असणारे कडक ऊन आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी असणारी थंडी याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. दिर्घकाळ खोकून दुखणारा घसा आणि शरीर यामुळे हैराण झालेले अनेक जण आपल्या आजुबाजूला दिसत आहेत. हा खोकला संसर्गजन्य असून तो औषधांनीही लवकर बरा होत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आयुर्वेदातील काही उपाय यावर उपयुक्त ठरु शकतात.
हिवाळ्यामध्ये शरीरात साठलेला कफ उन्हामुळे पातळ होतो आणि शरीराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी खोकला येतो. अनेकांना या वातावरणात कोरडा खोकलाही होतो. त्यामुळे उलटीची उबळ आल्यासारखेही होते. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास त्याचा फायदा होतो.
१. कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडावा यासाठी दिवसभर गरम पाणी प्यावे.
२. दिवसातून ४ वेळा गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
३. गवती चहा, आलं, पारिजातकाचे १ पान, तुळशीची पाने, दालचिनी, २ मिरे, १ लवंग असे चार कप पाण्यात घालून उकळावे. हे मिश्रण १ कप होईपर्यंत उकळावे. यामध्ये गूळ घालून गरम असतानाच चहासारखे प्यावे. पहिले ४ दिवस हा काढा दिवसातून २ वेळा घ्यावा. कफ मोकळा होऊ लागल्यानंतर दिवसातून एकदा घ्यावा.
४. पाव चमचा सितोपलादी चूर्ण मधातून चाटावे. यामुळे छातीच्या स्नायूंना ताकद मिळते व कफ मोकळा होण्यास मदत होते.
५. १ चमचा आल्याचा रस आणि १ चमचा मध असे मिश्रण दिवसातून ४ वेळा घ्यावे.
६. आहारात दही, ताक, दूध असे कफ वाढविणारे पदार्थ काही दिवस टाळावेत.
७. संत्री, पेरु अशी फळे खाणे टाळावे. या फळांमुळे आधीपासून असलेला खोकल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ती टाळलेलीच बरी.
८. कोरडा खोकला असेल तर काळ्या मनुका चघळून खाव्या. तसेच खडीसाखरेचा तुकडाही चघळावा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.
धूम्रपानासाठी ई-सिगरेट वापरल्याने यकृतामध्ये मेद साठण्याचा धोका असल्याचे एका अभ्यासात संशोधकांना आढळून आले आहे.
ई-सिगरेट ही सामान्य सिगरेटच्या तुलनेने सुरक्षित असल्याचे त्यांच्या जाहिरातीतून सांगितले जात असल्याने ई-सिगरेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, असे अमेरिकेतील चार्ल्स आर ड्रय़ु वैद्यक आणि विज्ञान विद्यापीठातील थिओडोर सी फ्रीडमन यांनी सांगितले.
परंतु यकृतामधील अतिरिक्त मेद आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत असल्यामुळे ई-सिगरेट सामान्य सिगरेटच्या तुलनेने सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष आम्ही काढला आहे, असे फ्रीडमन यांनी म्हटले.
ई-सिगरेटमध्ये निकोटिन असते याचा संबंध यकृताच्या मद्यविरहित मेदाच्या रोगांशी असतो. परंतु दीर्घकाल ई-सिगरेटने धूम्रपान केल्याने हृदय, मधुमेह आणि यकृतावर कोणता परिणाम होतो हे अद्याप अस्पष्ट आहे.
अभ्यासासाठी १२ आठवडे प्रयोग करण्यात आले या वेळी हृदयरोग आणि यकृतामधील मेदासाठी जबाबदार असणाऱ्या एपोलिपोप्रोटीन ई जनुकांचा अभाव असणाऱ्या उंदरांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या रक्तात निकोटिनची पातळी ई-सिगरेटने धूम्रपान करणाऱ्यासाठी यातील एका गटाला ई-सिगरेटचा संसर्ग होईल अशा जागेत ठेवण्यात आले. तर दुसऱ्या गटाला क्षारयुक्त द्रवपदार्थाच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी ठेवण्यात आले. संशोधकांनी यकृताचे नमुने गोळा केले आणि यकृतातील जनुकांवर झालेल्या परिणामाचे निरीक्षण केले.
या वेळी ई-सिगरेटमुळे यकृतातील मेदाच्या वाढीला जबाबदार असणाऱ्या ४३३ जनुकांमध्ये बदल झाल्याचे आढळले. त्याचबरोबर (सिरकाडियन रिदम्स) जैविक घडय़ाळासंबंधित जनुकांमध्ये बदल झाल्याचे आढळले. सिरकाडियन रिदम्समध्ये बिघाड झाल्यास यकृतात मेद साठण्यासह यकृताचे आजार होतात.