ध्यानधारणा व प्राणायामासारख्या श्वासपद्धतीमुळे मेंदूची शक्ती वाढते, त्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.
डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजच्या संशोधकांनी म्हटले आहे, की श्वसन व लक्ष केंद्रित करणे या दोन गोष्टींचा संबंध प्रथमच जोडण्यात आला आहे. जर्नल सायकोफिजिऑलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे, की ध्यानधारणा व प्राणायामामुळे मेंदूतील रासायनिक संदेशवाहक असलेल्या नोराड्रेनलाइन या रसायनाची पातळी वाढते. जेव्हा आपल्या मनात कुतूहल असते, आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो किंवा भावना उद्दीपित होतात तेव्हा या रसायनाची निर्मिती होत असते. त्यामुळे मेंदूत नवीन जोडण्या तयार होतात.
योगी व बौद्ध आध्यात्मिक पद्धती यात श्वास हा महत्त्वाचा मानला जात असतो, असे ग्लोबल ब्रेन हेल्थ इन्स्टिटय़ूटचे आयन रॉबर्टसन यांनी सांगितले. श्वासाकडे लक्ष देऊन व तो नियंत्रित करून आपण प्राणायाम करतो त्याचा मोठा फायदा शरीरातील बदल व भावना नियंत्रित करण्यास होतो. त्यातून ध्यानधारणा करणाऱ्या साधकास मोठा फायदा होतो. श्वासाशी निगडित योगसाधना व स्थिर मन यांचा मोठा संबंध आहे. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूप वाढते.
संशोधकांच्या मते योगासनांची सुरुवात होऊन २५०० वर्षे झाली असून, त्याचा मनाच्या स्थिरतेवर चांगला परिणाम होतो असा दावा नेहमीच केला गेला, पण आम्ही तो प्रयोगात सिद्ध केला आहे, असे मायकेल मेलनचुक यांनी सांगितले.