मानेचे त्रास
साधारणत: वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली की, घराच्या बाहेर भरपूर फिरणार्या लोकांना मानेचे त्रास सुरू होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो. स्पॉन्डिलायटिस्ने जखडून टाकले जाते. प्रत्येक मानदुखी ही स्पॉन्डिलायटिस्मुळेच असते असे नाही. परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरू होऊ शकते. भरपूर काम करणे, संगणकापुढे बसताना आपली उंची आणि संगणकाचा स्क्रीन यांच्यात ताळमेळ नसणे किंवा मान उंच करून स्क्रिनवरचा मजकूर सतत वाचणे यामुळेही मानदुखी सुरू होते आणि डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते.
जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कधी ना कधी तरी मानदुखीचा त्रास झालेलाच असतो असे आढळून आलेले आहे. कारण मानदुखीची कारणे फार वेगवेगळी आहेत. काही लोकांना पाठीच्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानदुखी सुरू होऊ शकते. प्रवासात भरपूर धक्के बसल्यामुळे सुद्धा मानेचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आश्चर्याची गोष्ट म्हणजे घसा दुखू लागला म्हणजे मानही दुखू लागते. विशेषत: घशाला जर संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग मानेला त्रासदायक ठरू शकतो.
या मानदुखीवर काही इलाज घरच्या घरी करता येतात. यातले काही इलाज इतके सोपे आहेत की, त्यांचा औषधापेक्षाही चांगला उपयोग होतो. मेंथॉल आणि कापूर यांचा वापर जास्त उपयुक्त ठरतो. या दोन्हींचे समप्रमाणात मिश्रण करून किंवा दोन्ही उपलब्ध होत नसतील तर त्यापैकी एक बोटावर घेऊन दुखणार्या मानेच्या ठिकाणी चोळल्यास त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन मानदुखी कमी होते.
लव्हेंडर – लव्हेंडरचा उपयोग फार जुन्या काळापासून औषधी म्हणून केलेला आहे. आता लव्हेंडर ऑईल उपलब्ध झालेले आहे. हे तेल दुखर्या जागेवर चोळल्यास मानदुखी कमी होते. आल्याचा उपयोगही असा होऊ शकतो. मात्र आले चोळण्यासाठी न वापरता त्याचा चहा प्यावा किंवा आल्याचा काढा घ्यावा. काही लोक आल्याचा रस काढून तो दुखर्या भागावर चोळतात. तोही उपाय चालतो. अर्निका या फुलापासून एक औषध बनवले जाते. ते बाजारात मिळते. तेही मानदुखीवर वापरता येते.
कामाचं स्वरूप- गृहिणी, शेतमजूर, विद्यार्थी अशा नानाविध कार्यगटातील आणि वयोगटातील व्यक्तींना मानदुखी असू शकते. वाकून काम करणं, वजन उचलणं, पाठीवर ओझं वाहणं, सलग अनेक तास चालणं, संगणकावर सलग काम करणं, इत्यादी गोष्टी मानेचे मणके आणि स्नायूंवर ताण पाडतात. ही सर्व कामं दैनंदिन जीवनाचा आणि व्यवसायाचा भाग असल्यानं टाळणं अशक्य असतं. त्याची परिणती म्हणजे मानेच्या मणक्याची झीज लवकर सुरू होते.
व्यायामाचा अभाव- व्यायामाकडे दुर्लक्ष, स्थूलतेमुळे स्नायूंमध्ये वाढणारं मेदाचं प्रमाण हा मानदुखीला हातभार लावणारा सर्वांत मोठा घटक. मान दुखणं म्हणजे, जे काम तुम्ही करत आहात, ते सहन करण्याची क्षमता मानेच्या स्नायूंमध्ये नाही, असं सांगण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. त्यामुळे जोपर्यंत स्नायू बळकट होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही गोळी किंवा मलम हा मानदुखीवरील अंतिम उपाय असू शकत नाही.
जीवनसत्वांचा अभाव- खाण्याच्या सवयी, वातानूकुलीत जीवनशैली यामुळे अनेक व्यक्तींमध्ये 'बी१२' आणि 'ड' जीवनसत्वाचा अभाव असतो. ही जीवनसत्वं हाडांची मजबूती, नसांची कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक असतात. शाकाहारी जेवणामुळे 'बी १२'ची कमतरता, 'ड' जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं कोवळं ऊन न मिळाल्यामुळे मानदुखीला हातभार लागतो.
दुचाकीवरचा प्रवास- भारतीय रस्त्यांबद्दल फार काही न बोलणंच बरं. खाचखळग्यांतून दुचाकीवरून केलेला प्रवास म्हणजे मानदुखीला आमंत्रण. दुचाकीवरून दररोज खूप अंतर कापणं, दुचाकी चालवताना सदैव हादरे बसणं, दूर अंतर कापताना मधे विश्रांती न घेणं, या गोष्टी मानेच्या मणक्यासाठी धोकादायक असतात.
दैनंदिन जीवनातील काही गोष्टी टाळता येण्याजोग्या नसतात. दिवसभर झोपून राहता येत नाही. काही साध्या गोष्टींची काळजी घेऊन मानदुखी टाळता येऊ शकते.
मणक्यांच्या सर्जनना दाखवून मानेचा त्रास गंभीर स्वरूपाचा नाही, याची खात्री करणं. एक्स रे, एमआरआय इत्यादी तपासण्यांमुळे चकती सरकणं, मज्जारज्जूवर दाब असे त्रास तत्काळ ओळखता येतात. कदाचित ते साधी मानदुखी म्हणून दुर्लक्षिले जाऊ शकतात. असे काही त्रास असल्यास ते इंजेक्शन अथवा सुरक्षित अशा मणक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे बरे होऊ शकतात.
नियमित व्यायाम, फिजिओथेरपीद्वारे मानेचे स्नायू बळकट करणं, हा रामबाण म्हणावा इतका महत्त्वाचा उपचार आहे. नियमित व्यायामामुळे स्नायूंमधील मेदाचं प्रमाण कमी होतं. या स्नायूंमध्ये ताण देणारी कामं करण्याची ताकद येते.
कामाच्या जागेचा कार्याभ्यास- कामाच्या ठिकाणी केलेले नाममात्र कार्यबदल मान किंवा पाठदुखी घालवू शकतात. संगणकाचा पडदा डोळ्यांच्या सम उंचीवर असणं, त्यासाठी खाली वा वर पाहावं न लागणं, खाली न वाकता गुडघ्यावर बसून वजन उचलणं, अभ्यास करताना टेबल-खुर्चीचा वापर करणं, शिक्षकांनी फळ्यावर लिहिताना हात खूप उंच न करता मानेच्या पातळीवरून लिहिणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रवास करावा लागत असल्यास मध्ये विश्रांती घेण्यास विसरू नये.
आहारातील पथ्य- जितकं जास्त वजन, तितकी जास्त मान आणि पाठदुखी. वजनावर नियंत्रण ठेवणं, जेवणात 'डी३' आणि 'बी१२' जीवनसत्व असणाऱ्या घटकांचं प्रमाण वाढवणं, अति मांसाहारामुळे वाढणाऱ्या युरिक अॅसिड या सांधेदुखीस कारणीभूत घटकाचं प्रमाण वाढू न देणं, आहारातील कॅल्शिअमचं प्रमाण कायम ठेवणं या प्रमुख बाबी मानदुखीला हातभार लावणाऱ्या घटकांचं बऱ्याच प्रमाणात निर्दालन करू शकतात.