हातांची थरथर
आयुर्वेदाने वाताच्या बिघाडामुळे होणारे असे काही आजार सांगितले आहेत. ‘कंपवात’ हा त्यापैकीच एक विकार. हात, पाय कंप पावणे म्हणजेच ‘थरथरणे’ या स्वरुपात आढळणारा हा आजार कधी सौम्य तर कधी तीव्र स्वरूपामध्ये त्रास देतो.
लिहिताना हात कापणे, एखादी वस्तू पकडली असताना हात कापतो. चहाचा कप नीट स्थिर धरता न येणे, परीक्षेच्या वेळी किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी मानसिक तणावामुळे किंवा भीतीमुळे हातातील कागदपत्र इत्यादी वस्तू कापणे. अतिराग किंवा चीड आल्याने, भांडणाच्यावेळी हातपाय कापणे, रात्रीच्या वेळी घाबरल्यामुळे देखील अंग कापणारे अनेकजण असतात. अतिमद्यपानाच्या परिणामी हातपाय कापतात. तसेच नियमित मद्य घेणार्यांनी अचानक मद्यपान बंद केल्यानेदेखील हातपाय कापू लागतात.
थोडक्यात मानसिक कारणे आणि कंपवात यांचा अगदी निकटचा संबंध आहे. ‘कापरे भरणे’ किंवा ‘थरकाप उडणे’ हे वाक्प्रचार देखील त्यामुळे प्रचलित झाले आहेत. मोठ्या आजारानंतर आलेल्या तीव्र अशक्तपणामुळे देखील हातपाय कापतात. रक्तदाब वाढल्यामुळे देखील अंग कापते. अतिकष्टाच्या कामानंतर थकवा आल्यानंतरदेखील परत काम करताना सुद्धा हातपाय कापतात. तीव्र भीती, चिंता काळजी यांची तीव्रता जास्त असताना निर्माण होणारा तात्पुरत्या स्वरूपाचा कंप हा विकृती असत नाही, पण अतिशय शुल्लक चिंता, काळजी किंवा भीतीमुळे जर कंप निर्माण होत असेल तर मात्र अशा वेळी उपचारांची निश्चित गरज असते.
वार्धक्यातील शरीरातील ‘वात’ जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि स्नायू नाड्या यांचे बलदेखील कमी झालेले असते. परिणामी काही लोकांमध्ये हात, पाय आणि डोके या तीनही ठिकाणी कंप हे लक्षण आढळते. काहीवेळा हा कंप एवढा जास्त असतो की माणूस नीट स्थिर चालूदेखील शकत नाही. पार्किसन्सच्या विकारामध्ये आणि लहान मेंदूमधील दोष, शिरोमिघात यांच्या परिणामीदेखील ‘कंपवात’ हा विकार आढळून येतो.
लेखनीकाचा कंप/रायटर्व्स क्रॅम्प :
कंपवाताशी साधारण साधर्म्य असणारा हा एक विकार आहे. सततचे लिखाण करणारे तसेच सतत पैसे मोजण्याचे काम करणारे कॅशियर्स यामध्ये बोटांवर येणार्या सततच्या ताणामुळे लिहायला सुरुवात केल्यानंतर बोटे दुखू लागतात, कोपरापासून हातही दुखू लागतो. लिहिण्याचा वेग मंदावतो, पेन धरण्याची अतिरिक्त ताकद लावावी लागते. लिहिताना काहीवेळ मध्ये थांबावे लागते. प्राथमिक स्वरूपात अशा लक्षणांनी सुरू होणार्या या विकारात काही काळानंतर हातातल्या वेदना जास्तच जाणवतात. अक्षरांचे वळण बिघडते, लिहिण्याची क्षमता व वेग मंदावतो, लिहिण्याच्या जोडीला पेन धरण्यासाठी देखील जादा ताकद लावावी लागते आणि नंतर पुढच्या अवस्थेत बोटातील ताकद आणखीनच कमी झाल्याने पेन धरताही येत नाही.
आयुर्वेदिक उपचार :
‘कंपवात’ हा एक वातविकार असल्याने आयुर्वेदीय पद्धतीने शास्त्रीय उपचार दिल्यास यावर नक्कीच चांगला उपयोग होतो. यामध्ये प्रामुख्याने शरीरातील मांस, मेद, मज्जा या धातूंची शक्ती वाढविणारे तसेच जोडीला मनोबल वाढविणार्या औषधी व आहाराचा वापर केला जातो. याच्याच बरोबर पंचकर्म उपचाराला देखील अतिशय महत्त्व आहे.
मसाज व शेक :
आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या विविध वातशामक औषधांनी केलेल्या तेलाने शरीराला मसाज करणे, काही वेळा व त्यानंतर ‘पिंड स्वेद’ या प्रकाराने औषधीयुक्त भात व दूध यांच्या सहाय्याने शेक दिला जातो. बहुतांश रुग्णांमध्ये फक्त मसाज देखील उपयोगी पडतो. जो घरच्या घरी करता येतो. तीव्रता जास्त असल्यास बस्ती तसेच शिरोधारा ही पंचकर्म करावी लागतात. केरळीयन पद्धतीने गरम तेलाने मालिश करत शेकणे म्हणजेच पिडिंच्छीत हा उपचार विशेष उपयोगी पडतो.
औषधी उपचार :
वनस्पतीज औषधांपैकी बला, शुंठी, लाक्षा, शतावरी, कवचबीज, अश्वगंधा, दशमुळ, कुचला, एरंड, विदारीकंद, मुशली, ब्राह्मी, जटांमासी, शंखपुष्पी इत्यादी वनस्पती तर शृंगभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, रौप्य भस्म, सुवर्ण भस्म, नागभस्म, अभ्रकभस्म, त्रिवंग भस्म इत्यादी भस्मांचा व यांच्या एकत्रिकीकरणातून निर्माण झालेल्या औषधांचा वापर केला जातो.
आहार मार्गदर्शन :
आहारातील दूध, तूप, गव्हाचा शिरा, खीर, उडीदाचे घुटे, फळांपैकी आंबा, सफरचंद ही फळे कोहळ्याच्या वड्या, कोंबडी किंवा बोकडाचे मांस किंवा मटण, सूप, खजूर, बदाम, पिस्ता इत्यादीची खीर, डिंकाचा लाडू हे पदार्थ नियमितपणे घ्यावे.
हे लक्षात ठेवा :
वरीलप्रमाणे उपचार करीत असताना शारीरिक कष्टाची कामे, हाताच्या बाबतीत लिखाणाचे काम, जागरण काही काळापर्यंत जास्तीत जास्त टाळल्यास मांस स्नायू नाड्यांचे बल लवकर वाढते. तसेच ऊबदार कपडे वापरणे, विश्रांती यामुळे आजार लवकर बरा होतो. मानसिक चिंता, भय, काळजी इत्यादींच्या निराकरणासाठी प्राणायाम ध्यान धारणा यांचा उत्तम परिणाम मिळतो.
दुर्धर असा कंपवात उपचारांना अवघड असला, पूर्ण बरा होऊ शकत नसला तरीही आयुर्वेदीय उपचारांनी त्याचे प्रमाण अथवा त्रासाची तीव्रता निश्चितपणे कमी करता येते.