इबोला विषाणू रोग
इबोला विषाणू रोग (ईव्हीडी) किंवा इबोला रक्तस्त्रावी ताप (ईएचएफ) (संक्षिप्त नाव: एबोला, इबोला) हा मनुष्य व इतर सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे. हा रोग एबोला नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. ताप, घसादुखी, स्नायूदुखी, उलट्या इत्यदी एबोला रोगाची लक्षणे विषाणूबाधा झाल्याच्या दोन दिवस ते ३ आठवड्यांदरम्यान दिसू लागतात. त्यानंतर ६ ते १६ दिवसांत रोगी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. हा रोग संसर्गजन्य असून एका मनुष्याद्वारे दुसऱ्यामध्ये पसरू शकतो. एबोला रोगावर सध्या कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, प्रादुर्भाव झालेल्या प्राणी व माणसांना अन्य प्राणी व माणसांपासून वेगळे ठेवत प्रचंड काळजी घ्यावी लागते.[१]
ह्या विषाणूचा शिरकाव एखाद्या बाधित प्राण्याच्या (सामान्यत: माकडे किंवा वटवाघळे) रक्त किंवा शारीरिक द्रवपदार्थ यांच्याशी संपर्काद्वारे होतो. नैसर्गिक वातावरणात हवेतून पसरण्याबद्दल अद्याप खात्री नाही.[२] बाधित नसताना देखील वटवाघळे हा विषाणू वाहून नेऊ शकतात आणि पसरवू शकतात असे मानले जाते. मानवी संसर्ग झाल्यानंतर मात्र, हा रोग लोकांमध्ये देखील पसरू शकतो.
बाधित माकडे आणि रुग्णांपासून माणसांमध्ये या रोगाचा फैलाव कमी करणे याचा प्रतिबंधात समावेश होतो. अशा प्राण्यांना संसर्गासाठी तपासून आणि जर रोग आढळला तर त्यांना मारून आणि त्यांचे शरीर व्यवस्थित नष्ट करून हे केले जाऊ शकते. मांस व्यवस्थित शिजवणे आणि मांस हाताळताना संरक्षणात्मक कपडे घालणे, तसेच रोग्याच्या आसपास असताना संरक्षणात्मक कपडे घालणे आणि हात धुणे हे सुद्धा उपयोगी ठरू शकते.
एबोला रोगाला उच्च मृत्यूदर आहे: विषाणूने बाधित झालेले 50% ते 90% बर्याचदा मृत्यू पावतात. ईव्हीडीची ओळख १९७६ साली पहिल्यांदा आफ्रिका खंडातील सुदान आणि झैर येथे झाली. तेव्हापासून २०१३ पर्यंत आफ्रिकेमध्ये एबोलाचे १,७१६ व्यक्तींना एबोलाची बाधा झाली होती.
२०१४ इबोला साथ
२०१४ साली प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेमधील गिनी, लायबेरिया व सियेरा लिओन ह्या देशांमध्ये तसेच नायजेरियामध्ये एबोलाची तीव्र साथ आली असून या वर्षी एबोलाचे २०,०८१ रुग्ण आढळून आले. ह्यांपैकी ७,८४२ रुग्ण एबोलामुळे मरण पावले आहेत. या वर्षी ह्या रोगाची लागण झालेल्या सहा व्यक्ती माली देशात व एक व्यक्ती अमेरिकेत दगावली. स्पेन या प्रगत देशामध्ये देखील या रोगाचा रुग्ण आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या रोगाचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर दर आठवड्याला १० हजार नवे रुग्ण ह्या वेगाने एबोलाची साथ वाढेल असा इशारा विश्व स्वास्थ्य संस्थेने दिला आहे.