मधुमेह
मधुमेह (इंग्रजी: डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.
मधुमेहाचे प्रकार
प्रकार १
या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते.
प्रकार २
दुसर्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसर्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक वजन असणार्या आणि बैठे काम करणार्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणार्या व्यक्तींना दुसर्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
दुसर्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसर्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शनेच घ्यावी लागतात.
आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुर्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसर्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते.
स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत.
कारणे आणि लक्षणे
मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसर्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा.
दुसर्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसर्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बर्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा अंधुक दृष्टी ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसर्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
दुसर्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तीमध्ये आहे-
•सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल)
•जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे.
•आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तीमध्ये स्थूल आणि बैठे काम करणार्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणार्या व्यक्तीमध्ये टाईप २ चा मधुमेह वाढतो आहे.
•गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया.
•१४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब
•एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
•जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे. अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितिवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट आणि ॲड्रेनलजिक अँन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाला क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.
लक्षणे
एरवी सामान्य असणार्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारिता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट.
उपचार
सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणार्या व्याधी टाळणे. योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.
आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसर्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही.
प्रत्येक अन्न घटकामध्ये असणार्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे.
दुसर्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.
फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणार्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.
मधुमेह आहार काय असावा
Diabetes म्हणजेच मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.
मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.
तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.
मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.
लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात.
मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.
मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल.
डॉक्टर कडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक 'मधुमेह आहार तक्ता' बनवून घेऊ शकतात.
मधुमेह आणि झोप यांचा काय संबंध आहे हे पहा.
मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा 100 मिलीग्राम / डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण 70 ते 99 एमजी / डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या "पोस्टप्रेंडियल" शर्करा 140 एमजी / डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य संख्या आहेत.
पर्यायी उपचार
मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –
मेथी- मेथीच्या बिया आणि पूड - एका अभ्यासात रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.
[बिलबेरी]] - नावाचे (इंग्लंडमधे मिळणारे) फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.[ संदर्भ हवा ]
लसूण - ग्लूकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते.
कांदा - ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्शुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.
आफ्रिकन मिरची - मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.
मधुमेह हा जीवनशैली मुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैली मधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे. नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे.
आयुर्वेदिक औषध
'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.
सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड अरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणार्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.
ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करीत असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.