गरम पाणी पिण्याच्या भारतीय संस्कृतीचे जागतिक संशोधकांनीही कौतुक केले असून, नियमित गरम पाणी पिल्याने वजन घटण्याबरोबरच अनेक आजार दूर होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
पिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले. नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर आहार घेणाऱ्यांसाठी हादेखील एक अत्यावश्यक उपाय आहे. रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने आतडय़ातील विषयुक्त घटक दूर होण्यास मदत होते. ‘सायनस’चा आजार असलेल्यांनी रोज गरम पाणी घेतल्यास श्वसनप्रक्रियेतील संसर्ग कमी होण्यास मदत होते, असे संशोधकांनी स्पष्ट केले.
नियमित गरम पाण्यामुळे दातही बळकट आणि आरोग्यदायी होण्यास मदत होते. मात्र अतिगरम पाण्यामुळे दातांना इजा होण्याचाही धोका असल्याने याबाबत काळजी घ्यावी, असे संशोधकांनी सांगितले. अवेळी खाण्यामुळे अपचन, अॅसिडिटी, पित्त या त्रासावरही गरम पाणी हा प्रभावी उपचार असल्याचे संशोधकांनी सांगितले. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यातही गरम पाण्याचा वाटा महत्त्वाचा आहे. शरीरातील मेदयुक्त घटक दूर करण्यात साहाय्यभूत ठरत असल्याने वजन घटण्यास गरम पाण्यामुळे मदत होते, असे संशोधकांनी सांगितले.