सध्या सगळेच आपल्या आरोग्याबाबात जागरुक झाल्याचे चित्र आहे. यामध्ये आहाराला विशेष महत्त्व असल्याने त्याबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात. बाजारातही विविध गोष्टींचे आकर्षण दाखवून लोकांना भुलवण्याचे प्रकार केले जातात. कधी लठ्ठपणा कमी होण्यासाठी पाचक रस तर कधी मधुमेह कमी होण्यासाठी भाज्यांचा रस सर्रास घेतला जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या कितपत कमी होतात माहित नाही पण कोणत्याही सल्ल्याशिवाय आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आपल्या जीवावरही बेतू शकते. पुण्यात नुकताच एका महिलेचा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने मृत्यू झाला आहे. आता यामध्ये नेमके कोणते घटक होते किंवा भोपळा खराब होता का असे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भोपळ्याच्या गुणधर्मांविषयी जाणून घेऊया…
१. सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.
२. भोपळ्यामध्ये असणाऱ्या क्युकरबिटॅसिन एका विशिष्ट घटकामुळे कधीकधी हा रस प्रमाणापेक्षा जास्त कडू होतो.
३. या घटकामुळे काकडी, फळांचे रस, वांगे, खरबूज, लाल भोपळा या गोष्टींना कडवट चव येते.
४. भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.
५. अशाप्रकारचा भोपळ्याचा कडू रस प्यायल्यामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या, जुलाब यांसारखे त्रास उद्भवतात. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हा त्रास २ ते ७ दिवसांसाठी होत राहतो. कडवट चव असलेला भोपळ्याचा रस प्यायल्यास पुढच्या ३० मिनिटांत ही लक्षणे दिसायला लागतात.
६. अनेकदा असा रस प्यायल्याने काही गंभीर समस्या उद्भवतात. यात जठरामध्ये रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या उलट्या होणे आणि यकृताशी निगडित तक्रारी उद्भवणे यांचा समावेश असतो.