उन्हाळा संपत आला असला तरीही त्याचा तडाखा अजिबात कमी झालेला नाही. उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यां यांवर काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तात जास्त पाणी पिणे आवश्यक असते. मात्र याबरोबरच शहाळं पाणी, ताक, सरबते घेणेही आवश्यक असते. यात सर्वात उपयुक्त असे लिंबू सरबत उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास याची मदत होते. लिंबातल गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतातच मात्र साखर आणि मीठाचाही थकवा कमी होण्यासाठी चांगला उपयोग होतो. पाहूयात लिंबू सरबताचे आरोग्याला होणारे फायदे…
१. दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास लिंबूपाण्यामुळे मदत होते.
२. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वजन कमी करायचे असल्यास लिंबूपाणी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.
३. साखर न घालता घेतलेले पाणी मधुमेहींसाठीही उपयुक्त असते. तसेच यामध्ये कॅलरीज नसल्याने शरीरात साठणारे फॅटस साठत नाहीत.
४. लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
५. दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.
६. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.