तुम्ही गरोदर आहात ? मग जाता – येता सल्ले ऐकण्यासाठी तयार राहा. कारण या काळात कुटुंबातील व्यक्ती, मित्र – मैत्रीणी यांच्याकडून सल्ल्यांचा सपाटा होतो. काही एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जातात, तर काही सल्ल्यांना कोणताही वैज्ञानिक ठोस आधार नसतो. बाळाच्या आरोग्यासाठी कळत-नकळत असे सल्ले आजमावलेही जातात. मात्र डोळे झाकून सल्ले स्विकारण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. मग पहा अशाच 10 गंमतीशीर गैरसमजाबद्दल काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रेग्नसी ,लॅक्टॅशियन व लहान मुलांच्या आहार तज्ञ व सल्लागार सोनाली शिवलानी.
पहिला गैरसमज –
भिंतीवर गोंडस बाळाचे छायाचित्र लावल्यास , आपले बाळही गोंडस होते.
सत्य – नवजात बाळाचे सौंदर्य हे तुमच्या जनुकांवर अवलंबून असते. भिंतीवर गोंडस बाळाचे छायाचित्र लावून, ते आईने पाहिल्याने बाळही तसेच होईल. हा चुकीचा समज आहे. गरोदरपणाच्या काळात स्त्रीने बाळाचे छायाचित्र किंवा कोणतेही सकारात्मक चित्र पाहणे हे तिच्या आरोग्यासाठी हितावह आहे. मात्र त्यामुळे स्त्रिया आनंदी राहण्यास मदत होते.अशा चित्रांमुळे त्यांच्यावरील दिवसभराचा ताण कमी होतो. गर्भारपणात ताण-तणावाचा गर्भाच्या आरोग्यावर तसेच स्त्रीशरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
दुसरा गैरसमज –
सातव्या महिन्यानंतर , नारळाचे पाणी प्यायल्यास बाळाचे डोके नारळासारखे मोठे होते.
सत्य – असे शोध कोण आणि कसे लावतात, हे अगम्य आहे .मात्र हे साफ चूक आहे. शहाळ्याच्या पाण्यातून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होतो. निरोगी स्वाथ्यासाठी शहाळ्याचे पाणी हितावह आहे. यामुळे बाळाच्या डोक्याच्या आकारावर काहीही परिणाम होत नाही.
तिसरा गैरसमज –
शहाळ्याचे पाणी प्यायल्याने बाळाला खुप केस येतात, तर आईला पित्त्ताचा त्रास होतो.
सत्य- हा देखील एक गैरसमज आहे. गर्भारपणाच्या तिसर्या टप्प्यांत बाळाचे डोके खालच्या बाजुला असते. तसेच या काळात स्त्रियांना पित्ताचा त्रास होण्याचे प्रमुख कारण असते , ते म्हणजे त्यांचे वाढते पोट! जसजसे दिवस सरतात , तसतसे गर्भाशय खेचले जाते व आतडे वरच्या बाजूला जाते.यामुळे गरोदर स्त्रीयांना पित्ताचा व बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
चवथा गैरसमज –
सकाळी काही पांढरे पदार्थ खाल्ले तर बाळही गोरे होते.
सत्य – खरचं ! अहो मग, दुध व पावाने सार्यांनाच गोरे केले असते ना . हा निव्वळ एक गैरसमज आहे. तुमच्या खाद्यपदार्थांचा रंग तुमच्या बाळाचे सौंदर्य ठरवू शकत नाही. ते पुर्णतः जनुकांवर अवलंबून आहे.
पाचवा गैरसमज –
ग्रहणांच्या काळात स्त्रीने घराबाहेर पडू नये. व तसे केल्यास बाळात व्यंग निर्माण होते.
सत्य-: ग्रहण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा बाळाच्या आरोग्यावर किंवा व्यंग निर्माण होण्याशी काहीही संबंध नसतो. मात्र गर्भवती स्त्रियां बरोबरच इतरांनी देखील ग्रहण थेट डोळ्यांनी बघू नये.
सहावा गैरसमज-
गरोदर स्त्रियांच्या पोटाचा आकार बाळाचे लिंग सांगू शकते.
सत्य-: बाळ गर्भाशायात कोणत्या स्थितीत आहे, त्यावर स्त्रीयांच्या पोटाचा आकार ठरतो. त्याचा बाळाशी लिंगाशी काहीही संबंध नसतो.
सातवा गैरसमज –
गरोदर स्त्रियांचे एखादा पदार्थ खाण्याचे डोहाळे , बाळाच्या लिंगाचा अंदाज देऊ शकतो.
सत्य-: गरोदर स्त्रियांमध्ये, शरीरात पोषणद्रव्यांची कमतरता असल्याने त्यांना विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.त्यामुळे स्त्रियांचे डोहाळे आणि बाळाच्या लिंगाचा काहीही संबंध नसतो.
आठवा गैरसमज-
आईचा वर्ण , बाळाच्या लिंगाचा अंदाज देऊ शकतो.
सत्य-: गर्भारपणाच्या काळात स्त्री शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेत काही बदल होतात. काही वेळेस मानेवर दिसणारे डाग, काख काळवंडणे , तर काही जणींमध्ये चेहरा काळवंडतो.
नववा गैरसमज-
तूप किंवा तेल यांचे सेवन केल्याने प्रसुती सुलभ होण्यास मदत होते.
सत्य-: हा एक चुकीचा समज आहे. तेल/तूप खाल्ल्याने प्रसुती सुलभ होण्यास विशेष मदत होत नाही. उलट प्रसुतीनंतर अतिप्रमाणात खाल्लेल्या तेल ,तुपामुळे वाढलेल्या कॅलरीज कमी करणे कठीण होते.
दहावा गैरसमज-
गरोदर स्त्रीया दोन जीवांच्या असल्याने , त्यांनी दुप्पट खावे .
सत्य-: हे सामान्य असले तरीही चुकीचे आहे. तुमचे बाळ ,तुमच्यावर अवलंबून असले तरीही जेवण दुप्पट करण्याची गरज नाही. तुम्हाला किमान 300 अतिरिक्त कॅलरिजची गरज आहे. बाळाच्या आणि तुमच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी मार्ग निवडा. तसेच सर्वांगिण आहाराचा वापरा. मग पहा – गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’