पालकांनो लक्ष द्या! तुम्ही तुमच्या पाल्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह जास्त वेळ घालवू दिल्यास प्रौढावस्थेत ते निरोगी राहण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. हा अभ्यास सायकोलॉजिकल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी मुले बालपणात आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करतात त्यांना तिशीत रक्तदाबाचा त्रास कमी होत असल्याचे आढळून आले आहे.
बालपणातील सामाजिक सहवासाचा काही प्रमाणातील संरक्षणात्मक प्रभाव प्रौढावस्थेत आपल्या आरोग्यावर होतो, असे अमेरिकेतील टेक्सस टेक विद्यापीठाच्या जेनी कंडिफ यांनी सांगितले. यापूर्वीच्या अभ्यासात प्रौढ व्यक्तीच्या सामाजिक आयुष्याचा, जवळच्या नाते संबंधांचा दय़ रोगांशी संबंधित असल्याचे आढळले होते. आरोग्यावर अशाच प्रकारचा परिणाम बालपणात देखील आढळतो का नाही यावर संशोधकांनी अभ्यास केला. यासाठी संशोधकांनी २६७ व्यक्तींच्या माहितीची चाचणी केली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांनी सहा वर्षांच्या वयापासून १६ वर्षांच्या वयापर्यंत मित्रपरिवारासोबत दर आठवडय़ाला सरासरी किती वेळ घालवला हे सांगितले. या अभ्यासात व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाबाबतच्या माहितीचादेखील समावेश आहे. पौंगडावस्थेत आणि बालपणात जे लोक मित्रपरिवारसह जास्त वेळ घालवतात त्यांना मध्यम वयात निरोगी रक्तदाब असतो असे या विश्लेषणात आढळले आहे.