ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. ही समस्या कधी उग्र रुप धारण करेल हे सांगणं कठीण होतं. जोपर्यंत ताण आपल्या क्षमतेशी जुळणारे असतात तोपर्यंत ते प्रेरणादायी, आव्हानात्मक ठरतात; पण त्यापलीकडे गेले की मग मात्र आपल्या उत्पादकतेवर व कामगिरीवर परिणाम होतो, तसेच शारीरिक व भावनिक आरोग्यावरसुद्धा याचे गंभीर परिणाम होतात.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. त्यामुळे ताण, त्यातून येणारं नैराश्य हा विषय पुन्हा एका समोर आला आहे. या ताणाचं वेळीच नियोजन केलं तर नैराश्येच्या गर्तेत सापडण्यापासून माणूस वाचू शकतो. तेव्हा हा ताण म्हणजे काय? त्याचे आपल्यावर कसे परिणाम होतात? हे जाणून घेऊयात.
तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?
ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात.
अनेकदा व्यक्तींमध्ये एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे असे अनेक बदल होतात.
काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे व्यक्तींसोबत वारंवार घडते. यामुळे भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते.
तणाव का येतो?
बऱ्याच वेळा आपण तणावाखाली वावरतो, पण त्याचा उगमच कळत नाही व तणाव अजूनच वाढतो. खासगी तसेच प्रोफेशनल आयुष्यात येणाऱ्या समस्या या ताणाचं प्रमुख कारण ठरतात. याव्यतिरिक्तही काही कारणं आहेत ही कारणं तुम्ही शोधली तर तणावमुक्त होण्याची पहिली पायरी तुम्ही गाठलीच समजा.
तणावाचे नियोजन कसं कराल?
– जवळच्या विश्वासू सहकाऱ्याशी/कुटुंबातील व्यक्तीशी तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. तो/ती कदाचित तुम्हाला समस्या कशी सोडवावी ते सांगू शकणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला नक्कीच हलके वाटेल.
– आवश्यक झोप घ्या. रात्री मोबाइल, दूरदर्शन, सोशल साइटवर वेळ घालवू नका. अपुऱ्या झोपेमुळे कामगिरी सुमार होते.
– आवडत्या छंदात मन रमवा. काही नवे शिका. भटकून या
– अचूकपणाचा अतिरेक, नकारात्मक विचार व आपल्या हातात नसलेल्या गोष्टींच्या परिणामांचा विचार टाळा.
– माणूस नैराश्येत असला की या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणणं कठीण वाटतं पण एकदा का मानसिक तयारी पक्की केली नैराश्येच्या गर्तेतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणं सोप्प होतं.