उन्हाळ्यात नेमके खायचे तरी काय? असा प्रश्न अनेकदा पडतो. उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा आणि अंगावर येणारा घाम यामुळे अनेकदा चिडचीड होते. त्यामुळे जेवण करणंच काय पण, आयतं गरमागरम पदार्थांचं ताट जरी कोणी पुढे ठेवलं तरी ते खावसं वाटत नाही. अशा वेळी दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश आवर्जून करावा याविषयी थोडक्यात.
– उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात हलका फुलका आहार ठेवावा.
– वरण, आमटी, कोथींबीर किंवा आलं पुदिन्याची चटणी ही जेवणात असावी.
– हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यावेळी वाल, पावटा, छोले, राजमा, हरभरा ही कडधान्ये मात्र टाळावीत.
– मूग, मूगडाळ, तूरडाळ, मसूर, कुळीथाचे पीठ असं आहारात असावी.
– त्याचप्रमाणे काकडी-टोमॅटो-बीट-गाजर-कांदा यांची कोशिंबीरीचा आवश्य आहारात समावेश करून घ्यावा.
– तर कामावर जाणाऱ्यांनी दुपारच्या जेवणात डब्याला पोळी भाजी न्यावी. भाजीमध्ये हिरव्या भाज्या किंवा फळभाज्यांचा समावेश करावा.
– नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. कलिंगड, खरबूज, जाम अशी फळं खावीत.
– या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे.
– जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये तसेच जेवताना फ्रिजमधील थंड पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा.