पालकांनो लक्ष द्या! तुम्ही तुमच्या पाल्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह जास्त वेळ घालवू दिल्यास प्रौढावस्थेत ते निरोगी राहण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. हा अभ्यास सायकोलॉजिकल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी मुले बालपणात आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करतात त्यांना तिशीत रक्तदाबाचा त्रास कमी होत असल्याचे आढळून आले आहे.
बालपणातील सामाजिक सहवासाचा काही प्रमाणातील संरक्षणात्मक प्रभाव प्रौढावस्थेत आपल्या आरोग्यावर होतो, असे अमेरिकेतील टेक्सस टेक विद्यापीठाच्या जेनी कंडिफ यांनी सांगितले. यापूर्वीच्या अभ्यासात प्रौढ व्यक्तीच्या सामाजिक आयुष्याचा, जवळच्या नाते संबंधांचा दय़ रोगांशी संबंधित असल्याचे आढळले होते. आरोग्यावर अशाच प्रकारचा परिणाम बालपणात देखील आढळतो का नाही यावर संशोधकांनी अभ्यास केला. यासाठी संशोधकांनी २६७ व्यक्तींच्या माहितीची चाचणी केली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांनी सहा वर्षांच्या वयापासून १६ वर्षांच्या वयापर्यंत मित्रपरिवारासोबत दर आठवडय़ाला सरासरी किती वेळ घालवला हे सांगितले. या अभ्यासात व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाबाबतच्या माहितीचादेखील समावेश आहे. पौंगडावस्थेत आणि बालपणात जे लोक मित्रपरिवारसह जास्त वेळ घालवतात त्यांना मध्यम वयात निरोगी रक्तदाब असतो असे या विश्लेषणात आढळले आहे.
अन्नपदार्थातील काही पोषकद्रव्यांमुळे स्किझोफ्रेनियासारख्या आजाराची मानसिक लक्षणे कमी होत असल्याचा दावा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आला आहे.
मात्र उपचाराच्या सुरुवातीला योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये, मानसिक आजार असलेल्या तरुणाला अधिक प्रमाणात पूरक पोषक आहार दिल्यास त्यांच्यावर प्रभावी उपचार होत असल्याचे आढळून आले.
संशोधकांनी यासाठी स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झालेल्या ४५७ तरुणांची विविध पातळीवर तपासणी केली. त्यांना पूरक पोषकद्रव्ये असलेला आहार विविध टप्प्यांवर देण्यात आला. यात देण्यात आलेला विशिष्ट पूरक पोषण आहार हा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करत असल्याचे संशोधकांना दिसून आले.
मानसिक आजाराच्या उपचारांमध्ये पूरक पोषण आहार पुरवणे हे उपहासाने घेतले जाते, असे जोसेफ फर्थ यांनी सांगितले.
मानसिक आजाराच्या सुरुवातीला पुरेसा पोषकद्रव्ये असलेला आहार घेणे फायदेशीर आहे.
यासाठी आहे त्या उपचार पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. मात्र अतिरिक्त उपचार म्हणून काही रुग्णांसाठीही उपयुक्त असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
भावनिकदृष्टय़ा अस्थिर आणि चिंताग्रस्त व्यक्ती स्मार्टफोनच्या आहारी जात असल्याचा दावा नुकताच एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील डर्बी विद्यापीठ आणि नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ यांनी स्मार्टफोनचा वापर आणि व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंध शोधण्यासाठी १३-६९ वयोगटातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ६४० व्यक्तींचा अभ्यास केला. जे लोक मानसिक तणावाखाली असतात ते स्मार्टफोनचा अतिवापर चिकित्सा म्हणून करतात. त्याचप्रमाणे स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे व्यक्तींना अधिक चिंता करण्याची सवय लागते, असेही या अभ्यासात आढळले आहे. जगभरात ४.२३ अब्ज स्मार्टफोन वापरले जातात. काही लोकांसाठी स्मार्टफोन ही त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेची गोष्ट झाली आहे, असे डर्बी विद्यापीठातील प्राध्यापक जहीर हुसैन यांनी सांगितले.
लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात तणाव, चिंता, नैराश्य, कौटुंबिक अडचणी अशा प्रकारच्या अनेक समस्या असतात. त्यामुळे ते भावनिकदृष्टय़ा अस्थिर होतात. तर या समस्यांपासून निसटण्यासाठी ते स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर करतात, अशा प्रकारचे वर्तन चिंताजनक असल्याचे हुसैन यांनी म्हटले.
या अभ्यासामध्ये चिंता स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित असल्याचे आढळून आले. याआधी झालेल्या अभ्यासातदेखील स्मार्टफोनचा अतिवापर आणि चिंतेचे वाढते प्रमाण यामध्ये दुवा असल्याचा निष्कर्ष देण्यात आला होता. जे लोक आपल्या भावना उघडपणे मांडत नाही त्यांना अति स्मार्टफोन वापरण्याची समस्या असल्याचे अभ्यासात स्पष्ट केले आले. भावनिक स्थिरता ही मानसिक स्थिरता आणि संवेदनक्षमता यामुळे ठरते आणि आमच्या अभ्यासात भावनात्मकदृष्टय़ा अस्थिर असणे हे स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित आहे, असे हुसैन यांनी म्हटले.