मुंबई : वातावरणात बदल झाला की त्याचा लगेचच परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळा म्हटला की आजार हे आलेच. यावेळी सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे अधिक दिसून येतात. मात्र या आजारांवर तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करु शकता. सर्दी झाल्यास तुमच्या किचनमधील काही पदार्थांचा वापर करुन यावर मात करु शकता.
मध आणि आल्याचा रस
घश्यात त्रास असल्यास मधाच्या सेवनाने फायदा होतो तर आल्यामध्ये अँटीबायोटिक गुण असतात. आले आणि मध समप्रमाणात घेऊन एकत्र वाटा. या मिश्रणात तुम्ही अर्धा ग्लास दुधही मिसळू शकता. यामुळे सर्दी बरी होते. तसेच घश्याचा त्रास होत असल्यास तोही बरा होतो.
हळद
हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. हळकुंड एका बाजूने जाळा. त्याच्या गंधाने तुम्हाला सर्दीपासून सुटका मिळू शकते.या यासोबतच दुधातही तुम्ही हळद टाकून प्यायल्यास घसा मोकळा होतो.
अळशी, लिंबाचा रस आणि मध
सर्दीमध्ये अळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो. पाण्यात अळशी टाकून हे पाणी उकळवा. जोपर्यंत हे मिश्रण दाट होत नाही तोपर्यंत उकळवत राहा. यात लिंबाचा रस आणि मध टाका. सर्दीचा त्रास सतावत असेल तर दिवसातून दोन वेळा हे मिश्रण घ्या.
गूळ
आयुर्वेदात गुळाला महत्त्वाचे स्थान आहे. पाण्यात काळी मिरी टाकून पाणी उकळवा. यात थोडे जिरे टाका. त्यानंतर गुळाचा खडा टाका. जेव्हा गूळ पाण्यात विरघळून जाईल तेव्हा गॅस बंद करा. घश्यात खवखव होत असल्यास हे पाणी प्या.
हाडांचे आरोग्य कालानुरूप जपायला हवे. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांची गरज असते. मात्र, हाडांच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्याने या दिवसांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात.
लक्षणे
पायऱ्या चढउतार करताना किंवा उठता-बसताना त्रास होणे
थोडासा अधिक दाब पडल्यानंतर सांध्याच्या भागात सूज येणे
हाडांमधून आवाज येणे
पाण्यात अधिक काम केल्यास त्रास होणे
हाडे दुखणे वा ठसठसत राहणे
पाठ, पायांची हाडे, हातांच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदना अधिक वाढणे
कारणे
बदलती जीवनशैली, व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
उपाय
हिवाळ्यात ऊन कमी असते. त्यामुळे उन्हात बसायला हवे. त्याने हाडांना पोषण मिळते.
थंड पाण्यात काम करणे टाळा. पायात कायम घरात वापरायच्या चपला घाला.
हिवाळ्यात आहारावर लक्ष ठेवावे. शिळे अन्न खाऊ नये. आहारात फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा.
वजन वाढणाऱ्या पदार्थांना या दिवसात दूर ठेवावे. तसेच आहारात ड आणि क जीवनसत्त्व देणाऱ्या पदार्थांचा वापर करावा. मासांहार पूर्ण वर्ज्य करावा.
हिवाळ्यात भूक जास्त लागते. मधल्या वेळी पौष्टिक लाडू, सूप, उपमा, एखादे फळ किंवा खजूर असा पौष्टिक आहार घ्यावा.
हातापायात मोजे वापरावे.
सायकल चालवणे, पोहणे, चालण्यासारखे व्यायाम करणेसुद्धा गरजेचे आहे. व्यायामामुळे सांध्यांना लवचिकपणा, गतिशीलता आणि स्नायूंना शक्ती मिळते.
गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत करावे. अधिक आहार घेतल्याने त्यांचे वजन वाढू लागते व त्याचा ताण गुडघ्यांवर येऊन वेदना वाढतात.
रात्री झोपण्यापूवी दोन्ही पाय गरम पाण्यात ठेवावे व नंतर तिळाच्या तेलाने मालिश करून मोजे घालून झोपावे.
या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. मात्र, अतिगरम पाणी टाळावे.
खेळण्याबरोबरच धनुष्यबाणाचा वापर, दिवाळीच्या वेळी उडवले जाणारे फटाके, बॅडमिंटन खेळताना डोळ्याला बसलेला शटलचा जोराचा फटका यांसारख्या गोष्टींमुळे डोळ्याला इजा होण्याची शक्यता वाढते. या अपघातांप्रमाणेच कारखान्यातील कामगार, वेल्डिंग करताना योग्य चष्मा न वापरणे यामुळेही डोळ्याला इजा होते.
डोळ्याला होणाऱ्या इजा या अपघाती स्वरुपाच्या असल्या, तरी त्या काही वेळा अतिशय किरकोळ तर काही वेळा डोळ्याची संपूर्ण दृष्टी गमावून बसण्याइतक्या गंभीर स्वरुपाच्या असू शकतात. लहान मुले खेळताना खेळातील धनुष्यबाणाचा वापर करतात. अशा वेळी असा बाण डोळ्याला लागून डोळा फुटून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. विटी दांडू, क्रिकेट खेळताना डोळ्याला विटी किंवा चेंडू लागणे या काही नेहमीच घडणाऱ्या घटना नाहीत; पण काही वेळा अशा अपघाताने डोळ्याला दुखापत होऊ शकते. दिवाळीच्या वेळी उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे डोळ्याला कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. दिवाळीत फोडणाऱ्या बॉम्बवर डबा किंवा खोके ठेवल्यामुळे स्फोटानंतर पत्र्याचे तुकडे लागून आजूबाजूच्या लोकांनाही डोळ्याला इजा झाल्याची उदाहरणे आहेत. वरील गोष्टींवर पालकांनी देखरेख ठेवल्यास होणारे डोळ्याचे अपघात टळू शकतात. बॅडमिंटन खेळतानाही डोळ्याला शटलचा जोराचा फटका बसून काही प्रसंगी खूप गंभीर स्वरुपाची इजा पोहोचू शकते.
कारखान्यात लेथवर काम करणाऱ्या कामगारांनी तर विशेष काळजीपूर्वक वागले पाहिजे. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या कारखान्यांतून अशा ठिकाणी काम करताना रोज कमीत कमी १५ ते २० कामगारांच्या डोळ्यात 'बर' जात असतील. हा 'बर' काढल्यानतंर डोळ्याला पट्टी लावल्यामुळे कामगारांना दोन-तीन दिवस कामाला मुकावे लागते; पण याहीपेक्षा वेगाने आणि धातूचे मोठे कण जर बुबुळ छेदून आत गेले, तर बुबुळ फाटणे, त्यातून बाहुली बाहेर येणे, मोतीबिंदू होऊन तो आतल्या आत फुटणे, डोळ्याच्या आतील भागात तीव्र स्वरुपाचा रक्तस्राव होणे किंवा पडद्याला इजा होऊन तो सरकणे इ. गोष्टी संभवतात. अशा वेळी डोळ्याचा एक्स रे अथवा अल्ट्रा साउंड चाचणी करून डोळ्याला किती गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे, हे पाहता येते. फाटलेले बुबुळ शिवून झालेला मोतीबिंदू काढून टाकून आतील धातूचा कण व्हिट्रॅक्टोमी या शस्त्रक्रियेमार्फत काढून टाकून तो सरकलेला पडदा म्हणजे रेटिना परत जागी बसवणे हे एक आव्हान आहे. तीन-चार तासांच्या अतिशय कठीण शस्त्रक्रियेनंतर अशा तऱ्हेने गंभीर दुखापत झालेला डोळा वाचेलच अशी खात्रीही देता येत नाही. कित्येक वेळा अशा डोळ्यांमध्ये सेप्टीक होऊन दृष्टी तर जातेच; पण डोळा अतिशय बारीक होऊन पांढरा पडतो.
वेल्डिंग करताना योग्य तऱ्हेचा चष्मा न वापरल्यामुळे बुबुळाला छोट्याशा जखमा होतात. अशा वेळी रात्री झोपताना प्रचंड वेदना जाणवतात. झोप येणे अशक्य होते. स्वच्छ कापसाच्या घड्या गार पाण्यात घालून डोळ्यावर ठेवल्या असता बराचसा आराम वाटतो. वेदना खूप होत असल्यामुळे वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. साधारणपणे १०-१२ तासांतच डोळ्याला आराम पडून डोळा पूर्ववत होतो. ज्या ठिकाणी असे अपघात होऊन डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोटेक्शन ग्लासेस वापरण्यामुळे वरील अपघात टळू शकतात.
काहींमध्ये खूप पाणी पिण्याची सवय असते तर काहीजण ऋतूमानानुसार शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये काही अतिरिक्त घटकांचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. त्याचा विचार प्राधान्यानं केला जात नाही. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु, केवळ पाणी पिऊन उपयोग नाही. कारण उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातून सोडियमही निघून जात असतं. म्हणून पाण्यासोबत मीठही योग्य प्रमाणात शरीरात जायला हवं. त्यामुळे पाणी किंवा लिंबू पाणी प्यायचं असेल तरी चिमूटभर मीठ टाकूनच प्यायलं पाहिजे. विशेषत: मधुमेहींनी ही बाब लक्षात ठेवायला हवी.
सोडियमचं प्रमाण कमी झाल्यास मळमळते, डोकेदुखी वाढते. भूक मंदावते, गोळे येतात. हे विकार टाळण्यासाठी पाण्यासोबत शरीरात मीठही जाणं महत्त्वाचं असतं हे सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. शहरांमधली सध्याची एकूण जीवनशैली पाहता बाहेर खाण्याचं प्रमाण बरंच आहे. बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ हे अर्धवट तळून ठेवलेले असतात. ऑर्डर आली की ते पुन्हा तळून तुम्हाला देण्यात येतात. अर्धवट तळलेल्या पदार्थांमध्ये जंतू वाढतात. उन्हाळ्यात आणि साधारण जुलै महिन्यात अन्न दूषित करणाऱ्या जंतूंचं प्रमाण बरंच असतं. त्यामुळे बाहेर खाणं शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे तहान शमवण्यासाठी बऱ्याचदा गाड्यांवर मिळणारी फळे, बाहेरचं लिंबू पाणी प्यायलं जातं. परंतु, उघड्यावर ठेवलेल्या पदार्थजंतूंना आमंत्रण देतात आणि बाहेरच्या लिंबू सरबतात वापरला जाणारा बर्फ बहुधा दूषित असतो. त्यामुळे फळे, लिंबू सरबत अवश्य प्या, पण घरी आणून. कलिंगड, संत्र, डाळींब या फळांचं या कालावधीत सेवन करायला हवं. शहाळ्याचं पाणीसुद्धा आवर्जून प्यावं. यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. त्यामुळे उष्ण वातावरणाचा शरीराला सामोरं जाता येतं.
उन्हाळा हा नाजूक वयोगटांसाठी म्हणजेच १० वर्षांखालील आणि ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी काहीसा धोकादायक असतो. या काळात त्यांना हीट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हीट स्ट्रोकमध्ये शरीराची तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा निकामी होते आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडते. त्यामुळे दुपारी १२ ते २च्या दरम्यान बाहेर पडू नये. त्याचप्रमाणे बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकलेलं असावं. याच्याशीच संबंधित अजून एकभाग म्हणजे लहान मुलांना ताप वगैरे आला तर बर्फाच्या पाण्याची पट्टीकपाळावर न ठेवता संपूर्ण अंग साध्या पाण्यानं पुसून काढावं. उन्हाळ्यात होणारा अजून एक विकार म्हणजे बद्धकोष्ठता. पाणी कमी होणं हेच यासाठी कारणीभूत असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणारी फळं वगैरे अवश्य खावीत. पण त्यांच्या स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष पुरवण्यात यावं. अल्सर असलेल्या व्यक्तींना उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांपासून अल्सर असलेल्या व्यक्तींनी तसंच सामान्य प्रकृती असलेल्या व्यक्तींनीही लांबच राहावं. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरातील आम्ल वाढते आणि त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. तात्पर्य, उन्हाळ्यात योग्य आहार घेऊन विकारांना टाळता येऊ शकतं.
ज्यांच्या घरात साधारण दहा-बारा महिन्यांची बाळं असतात, अशी मंडळी आजकाल डॉक्टरांना हा प्रश्न विचारतात. प्रश्न ऐकून डॉक्टरांना खरंच खूप भरून येतं. २१व्या शतकातील आरोग्यशैलीत या पालकांनी बाळाला चक्क दूध पाजायचा निर्णय घेतला, हेच खरं डॉक्टरांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. गायीचं दूध, म्हशीचं दूध, डबाबंद पावडरचं दूध, पॅकेज्ड दूध, सोया दूध, बदामाचं दूध असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर असतात. आपल्या या प्रश्नाचं उत्तर संगणकावर न शोधता डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या गोष्टीचं अप्रूप डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही, तर नवलच.
तसं पहिलं, तर दूध हे पूर्णान्न समजलं जातं. एक वर्षापर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं आवश्यक असतं. त्यानंतर मुलांना सर्व स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, कर्बोदकं असे सर्व अन्नघटक, जीवनसत्वं आणि कॅल्शियमसारखी खनिजं पुरवणारे दूध हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे मुलांचे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्था उत्तम बनते. त्यातही आपल्या देशात फार पूर्वीपासून गायीचंच दूध मुलांसाठी उत्तम समजलं जातं.
या समजुतीला पुष्टी देणारं एक संशोधन नुकतंच ‘अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशन’च्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. कॅनडामधील सेंट मायकेल्स हॉस्पिटलमधील डॉ. जोनाथन मॅग्वायर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या संशोधनानुसार, जी मुलं गायीचं दूध अगदी लहानपणापासून नियमितपणानं घेतात, त्यांची उंची इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वाढते.
या संशोधनामध्ये २ वर्षं ते ६ वर्षं वयाच्या ५,०३४ मुलांची वर्षभर पाहणी करण्यात आली. या मुलांना रोज १ ते ३ कप दूध देण्यात आलं. यातील ८७ टक्के मुलांना फक्त गायीचं, १३ टक्के मुलांना इतर प्रकारचं आणि ५ टक्के मुलांना दोन्ही पद्धतीचं दूध रोज देण्यात आलं.
या सर्वेक्षणाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या आणि चित्तवेधक गोष्टी नजरेस आल्या :
जी मुलं गायीचं दूध घेत नव्हती, त्यांची उंची त्यांच्या वयाला किमान अपेक्षित उंचीपेक्षा कमी भरली. आकडेवारीनुसार दर कप (२५० मिलीलिटर) दुधामागे ०.४ सेंटीमीटरनं ती खुजी भरली.
ज्या मुलांना फक्त गायीचं दूध दिलं जात होतं, त्यांची उंची त्यांच्या वयाच्या किमान अपेक्षित उंचीप्रमाणे ०.२ सेंटीमीटरनं अधिक वाढली.
३ वर्षांच्या मुलांमध्ये रोज ७५० मिलीलिटर गायीचं दूध घेणारी मुलं, त्याच वयाच्या इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा १.५ सेंटीमीटरनं उंच भरली.
जी मुलं गायीचं आणि इतर असं दोन्ही प्रकारचं दूध घेत होती, त्यांची उंचीदेखील फक्त गायीचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा कमी भरली.
या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की ५०० मिलीलिटर गायीच्या दुधात सर्वसाधारणपणे १६ ग्रॅम प्रथिनं असतात. म्हशीच्या दुधात ती तितक्याच प्रमाणात असतात; पण सोया मिल्क, बदामाचं दूध आणि इतर पॅकेज्ड दुधात ती खूपच कमी असतात. गायीच्या दुधातील प्रथिनं बाळाच्या पचनास सोपी असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम उत्तम होतो. म्हशीच्या दुधात स्निग्धांश खूप जास्त असतो. त्यामुळे मुख्यत्वे मुलांच्या चरबीत वाढ होते. दोन्ही प्रकारच्या दुधातजीवनसत्व आणि कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजं भरपूर असतात; त्यामुळे उंची वाढायला मदत होते. या संशोधकांच्या मते उंची वाढण्याच्या क्रियेला गायीच्या दुधाची जास्त मदत होते.
या संशोधनाचा मुख्य भर हा कृत्रिम आणि फॅन्सी दुधांवर जास्त आहे. एकविसाव्या शतकातल्या पालकांनी हे लक्षात घ्यावं, की नैसर्गिक दूध मग ते गायीचं असो, की म्हशीचं, कुठल्याही जाहिरातबाजी करणाऱ्या दुधाच्या ब्रँडपेक्षा जास्त सकस असतं. त्याचबरोबर, दुधात टाकून त्याची चव बदलणाऱ्या आणि मुलांची उंची आणि स्टॅमिना वाढवण्याची अशास्त्रीय जाहिरात करणाऱ्या बाजारू चॉकलेटी पावडरींपेक्षा गायीचं दूध लक्षपट आरोग्यदायी असतं.