कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.
तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी विचार –
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र –
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. कान यंत्र घेण्यापूर्वी हा कान मंत्र समजून घेतला तर इंद्रियाची जपणूक होईल.
कानाचे आजार
कानाची रचना आणि कार्य
कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत असतो. कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात. बाहेरचा भाग फक्त ध्वनिलहरी-(आवाजाची कंपने) गोळा करून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचवतो.
बाह्यकर्ण
बाह्यकर्णाची रचना नरसाळयासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग मऊ राहतो.
मध्यकर्ण
मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. तिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो. दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो. मध्यकर्णाची पोकळी एका नळीने (कानाघ नळी) नाकाला जोडलेली असते. या नळीमुळे मध्यकर्णातील हवा बाहेरच्या हवेशी जोडली जाऊन सम दाबात राहते. यामुळे कानाचा पडदा सुरक्षित राहतो. असे नसते तर कानाचा पडदा कमीजास्त दाबाबरोबर आत किंवा बाहेर फुगला असता. सर्दी झाली, की या नळयांची तोंडे सुजून बंद होतात;यामुळे मध्यकर्णात विचित्र संवेदना होते. कधी कान गच्च झाला आहे असे वाटते; तर कधी कानाला दडे बसल्यासारखे वाटते.
सर्दीपडशात नाकातील घाण मध्यकर्णात जाऊन मध्यकर्णाचा दाह सुरू होतो. यामुळे कान ठणकून कधीकधी फुटतो. मध्यकर्णात तीन लहानलहान हाडांची साखळी असते ही साखळी एका बाजूने कानाच्या पडद्याशी लागते तर दुस-या बाजूने अंतर्कर्णाच्या शंखाला जोडलेली असते. या साखळीचे काम म्हणजे ध्वनिकंपनांनी होणारी पडद्याची हालचाल अंतर्कर्णाच्या शंखापर्यंत नेणे. कान वारंवार फुटत असेल तर ही साखळी जंतुदोषाने खराब होऊन ऐकू येत नाही. मध्यकर्णात पू झाला, की कान ठणकतो. मात्र पडदा फुटून पू बाहेर पडला, की ठणका थांबतो.
अंतर्कर्ण (शंख किंवा गाभारा)
अंतर्कर्ण म्हणजे हाडाच्या पोकळीत बसवलेला गाभारा किंवा एक नाजूक शंख. त्या शंखाचे मुख्य काम म्हणजे ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंतर्फे मेंदूपर्यंत पोचवणे. याला तीन अर्धवर्तुळाकार नळया जोडलेल्या असतात. त्यांना एकत्र जोडणारा छोटा फुग्यासारखा भाग असतो. या शंख व नळया तोल-स्थिती-गती यांच्याबद्दल मेंदूकडे संदेश पाठवतात. ध्वनिलहरी व स्थिती-गती ज्ञान कसे होते हे आपण अगदी थोडक्यात पाहू या.
ध्वनिज्ञान
शंखाकृती ध्वनिशंखात एक द्रव भरलेला असतो. त्याच्या कोषात हारमोनियमच्या (बाजाची पेटी) पटटयांसारखी रचना असलेला एक पडदा बसवलेला असतो. ध्वनिकंपने हाडाच्या साखळीमार्फत ध्वनिशंखामध्ये पोचतात. या ध्वनिकंपनांमुळे ध्वनिशंखातल्या द्रवाची हालचाल होते. त्यामुळे ध्वनिविशिष्ट पेशींचेही कंपन होते. यानुसार पेशींना जोडलेल्या मज्जातंतूंमार्फत ध्वनिसंदेश मेंदूत पोचवले जातात. हा ध्वनिशंख मज्जातंतू आणि मेंदूतले ध्वनिकेंद्र यामुळे ध्वनिज्ञान होते. मध्यकर्णाच्या दीर्घकालीन आजारात (जंतुदोष) कानाचा पडदा आणि हाडांची साखळी खराब होतात. यामुळे मध्यकर्णामार्फत आवाज ऐकू येणे बंद होते. पण कवटीच्या हाडांवर कंपने आदळून हा आवाज हाडामार्फत ध्वनिशंखात पोचू शकतो. यामुळे काही प्रमाणात तरी ध्वनिज्ञान शाबूत राहते. या तत्त्वाचा उपयोग करून फक्त मध्यकर्ण बिघडलेल्या व्यक्तीस हाडामार्फत थोडे ध्वनिज्ञान मिळवता येईल. पण ध्वनिशंख व पुढली यंत्रणा नष्ट झाली तर त्या कानास ठार बहिरेपणा येईल.
तोल आणि स्थिती ज्ञान
अंतकर्णाचे दुसरे काम म्हणजे गतिस्थिती ज्ञान. शरीराच्या गती-स्थितीचे ज्ञान अनेक मार्गांनी (स्नायू, सांधे, दृष्टीज्ञान आणि अंतर्कर्णातील व्यवस्था) होत असते. अंतकर्णाचेयंत्रणा त्यापैकीच एक आहे. ही यंत्रणा म्हणजे तीन अर्धवर्तुळाकार नळया व त्यांना एकत्र जोडणारा लहानसा फुगा असतो. या सर्व भागात द्रवपदार्थ असतो. नळयांमध्ये खास संवेदनाक्षम पेशी असतात. या पेशींच्या थरावर पातळ पण वजनदार कणांचा एक थर असतो. द्रवपदार्थ आणि हा पातळ वजनदार थर यांच्या हालचालींचे संदेश मज्जातंतूंमार्फत मेंदूत पोचतात. ही सूक्ष्म हालचाल होते याचे कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण. डोक्याच्या स्थितीप्रमाणे (आडवे, उभे, तिरपे, उलटे) आणि गतीप्रमाणे (पुढे, मागे, वर्तुळाकार गती) द्रवपदार्थ व वजनदार थराची हालचाल होत राहते. याचे मेंदूत संदेश पोचतात. या यंत्रणेत बिघाड झाला तर तोल सांभाळता येत नाही. कानाच्या काही आजारांमध्ये या यंत्रणेपर्यंत आजार पोचला तरीही तोल सांभाळण्याचे काम बिघडते.
ध्वनिकाटयाने तपासणी
केवळ मध्यकर्ण बिघडला आहे की ध्वनिशंखही बिघडला आहे हे साध्या तपासणीत कळू शकते. यासाठी चिमटयासारखे एक खास लोखंडी उपकरण असते. (याला ध्वनिचिमटा किंवा ध्वनिकाटा म्हणू या) या ध्वनिकाटयाचा वापर करून एकदा कानासमोर व एकदा कानामागच्या हाडावर आळीपाळीने टेकवा. ध्वनिकाटा टेकवल्यावर 'ऐकू' येते का ते पुढीलप्रमाणे तपासता येते. (निर्दोष) कान चांगला असल्यास कानासमोर काटा धरण्यापेक्षा हाडावर टेकवल्यावर जास्त चांगला आणि जास्त वेळ आवाज ऐकू येतो. मात्र मध्यकर्ण बिघडल्यास ध्वनिकाटयाने कानासमोर काही ऐकू येत नाही, पण हाडांवरून ऐकू येते. ध्वनिशंखही बिघडला असल्यास कोठूनच ऐकू येत नाही. ही तपासणी करायला तुम्हीही शिकू शकाल.