तोंडाला येणारी दुर्गंधी ही आपल्या समाजामधली एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणार्या, धूम्रपान करणा-या माणसांबद्दल मी बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात.
मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना स्वतःलाच होत असला तरी समाजामधील दोन घटक यामुळे खुश राहतात, एक दंतरोगतज्ज्ञ आणि दुसरे टुथपेस्ट्चे निर्माते. एवढ्या मोठ्या संख्येच्या देशामधील लोक आपल्या तोंडाच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असतील तर त्याचा फायदा उठवायला व्यापारी पुढे सरसावणारच ना ! भारतीयांचे मौखिक आरोग्य बिघडण्यास तशी अनेक कारणे आहेत, मात्र आयुर्वेदिय पद्धतीने दंत धावन न करता आधुनिक टुथपेस्ट्सचा वापर हे त्यामागचे एक मुख्य कारण असावे अशी शंका येते.
मुळात आपले पूर्वज खैर, करंज, वड, उंबर, पिंपळ, कडूनिंब, बाभूळ, वगैरे झाडाची लहानशी काडी घेऊन ती चावूनचावून अधिक मृदु करुन त्याने आपले दात व हिरड्या साफ करायचे. कडू-तिखट व तुरट चवीच्या या वनस्पती आपल्या गुणांनीच तोंडामधील घातक रोगजंतुंचा नाश करायाच्या, हिरड्या सुदृढ करायच्या व दातांवरील इनॅमलला मजबूत ठेवायच्या. इतकंच नव्हे तर गोडाच्या सेवनाचे शरीरावर होणारे विविध दुष्परिणाम नियंत्रणात ठेवण्याचा तो प्रभावी उपाय होता. कडू-तिखट-तुरट चवीच्या त्या वनस्पतींची वास्तवात आजच्या स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या आजच्या समाजाला अधिक गरज आहे.